काँग्रेसचा गोंधळ म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय; चंद्रपूर युतीवर सुषमा अंधारे यांचे स्पष्टीकरण
By किरण शिंदे | Updated: February 10, 2026 15:24 IST2026-02-10T15:23:32+5:302026-02-10T15:24:12+5:30
संघटनेत स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा निर्माण होऊ नये म्हणून संदीप गिरे यांनी माझ्याशी चर्चा करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला

काँग्रेसचा गोंधळ म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय; चंद्रपूर युतीवर सुषमा अंधारे यांचे स्पष्टीकरण
पुणे : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सहा भाजपला पाठिंबा दिल्याने महापालिकेत भाजप सत्तेत आले. भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी निवडून आल्या, तर उपमहापौर पदासाठी ठाकरे गटाचे प्रशांत दानव विजयी झाले. या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे.
अंधारे म्हणाल्या की, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा पूर्णपणे स्थानिक नेतृत्वाचा आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांप्रमाणेच युती किंवा आघाडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
“स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आपला वेळ आणि पैसा पूर्णपणे दिला आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच असला पाहिजे, ही आमची भूमिका राज्यभरात जशी होती तशीच चंद्रपुरातही होती, चंद्रपुरात संदीप गिरे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या. सुरुवातीला काँग्रेससोबत युती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उपमहापौर पद देण्याची तयारी दाखवत काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र स्थानिक नेतृत्व, विशेषतः प्रतिभाताई धानोरकर यांच्या भूमिकेबाबत स्पष्टता नसल्याने निर्णय लांबला.
“संघटनेत स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा निर्माण होऊ नये म्हणून संदीप गिरे यांनी माझ्याशी चर्चा करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूरमधील परिस्थिती आणि राजकीय समीकरणांची माहिती मी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि पक्षामध्ये कोणताही विसंवाद नाही,” असे अंधारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद ठाकरे गटाकडे गेल्याने चंद्रपूर महापालिकेत एक वेगळे राजकीय समीकरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.