"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:31 IST2026-04-06T11:31:32+5:302026-04-06T11:31:32+5:30
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने संजय राऊत यांनी मित्रपक्षावर टीका केली आहे.

"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
Sanjay Raut on Baramati byelection 2026: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने केलेले प्रयत्न फोल ठरले. काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता बारामतीतसुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
अजित पवारांच्या निधनानंतर ही जागा बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची सुरुवातीपासूनची भूमिका होती. खुद्द सुनेत्रा पवार यांनी यासाठी पुढाकार घेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, रविवारी रात्री दिल्लीतून काँग्रेसने आकाश मोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला. आज सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे दोन्ही प्रमुख उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संजय राऊतांची काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, "सुनेत्रा पवार यांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. आम्ही महाविकास आघाडीत आहोत, काँग्रेसने तिथे उमदेवार उभा केला आहे. सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली ती पाठिंब्यासाठीच असणार. हर्षवर्धन सकपाळ यांनाही त्यांनी फोन केला. छगन भुजबळ शरद पवार यांना भेटले. त्यामुळे हा निर्णय काय फक्त उद्धव ठाकरेंचाच आहे का? याच्यामध्ये खूप प्लेअर आहेत. बारामती हा पवारांचा गड आहे आणि तिथे काय निकाल लागणार हे सगळ्यांना माहिती आहे. राजकारणात काही विषय सामोपचाराने घ्यायचे असतात. सुनेत्रा पवार आज फक्त अर्ज दाखल करणार आहेत निवडणुकीला वेळ आहे."
"मुख्यमंत्री फडणवीसांना हवा आहे म्हणून आम्ही पाठिंबा द्यायचा का? उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करावी. आज फक्त अर्ज भरले जाणार आहे. पुढे पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. काँग्रेसने तिथे उमेदवार दिला आहे. काँग्रेसची एक भूमिका आहे की ते बिनविरोध निवडणुकांच्या पॅटर्नला विरोध करतात. असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. पण जेव्हा त्यांची गैरसोई होते तेव्हा ते म्हणतात की बिनविरोध निवडणूक होऊद्या. ज्यांना सरकार विरोधात राग काढायचा आहे त्यासाठी निवडणूक हे माध्यम असतं," असेही संजय राऊत म्हणाले.
२३ एप्रिलला मतदान; २० हून अधिक उमेदवार रिंगणात
बारामतीच्या या निवडणुकीत आतापर्यंत १९ जणांनी आपले अर्ज दाखल केले असून, हा आकडा २० च्या पार जाण्याची चिन्हे आहेत. मात्र, जर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला, तर सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर होऊ शकतो.