Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपकडून होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:43 IST2026-02-17T09:36:06+5:302026-02-17T09:43:41+5:30
- सुमारे १५ माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार

Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपकडून होणार कारवाई
पिंपरी : महापालिका निवडणुकीत भाजपातील बंडखोरांवर पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे १५ माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, यासंदर्भातील अहवाल पक्षाला सादर करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपच्या वतीने १०० पारचा नारा दिला होता. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर २२ जणांचे इनकमिंग झाल्याने १२५चा नारा नेत्यांनी दिला होता. मात्र, नेत्यांमधील वर्चस्ववाद आणि बंडाळीमुळे निवडणुकीमध्ये आश्वासन हवेत विरले. ८४ जागा भाजपने जिंकल्या. विद्यमान नगरसेवक पराभूत झाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांना विचारणा केली होती.
त्यानंतर भाजपने निवडणूक निकालाबाबत चिंतन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही स्थानिक नेत्यांचे कान टोचले होते. त्यानंतर राज्य सचिव राजेश पांडे यांच्या उपस्थितीतही बैठक झाली. त्यावेळी स्थानिक नेते उपस्थित होते. तेथे बंडखोरीचा विषय चर्चिला गेला. त्यावर पुण्याप्रमाणेच कारवाई होईल, असे सुतावोच नेत्यांनी केले होते. बंडखोरी करणारे नगरसेवक तसेच त्यांचे नातेवाइक यांच्यावर कारवाई करण्यासाठी अहवाल तयार करावा, अशा सूचना केल्या. त्यानुसार संघटना स्तरावर माहिती घेण्यात आली. त्यानुसार भाजपच्या वतीने दोन दिवसात कारवाई होणार आहे.
...यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव
माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे, अश्विनी संतोष जाधव, शारदा सोनवणे, आशा शेंडगे, ज्योती भारती, सीमा सावळे, वैशाली जवळकर, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, धनंजय काळभोर, शैलेश मोरे, भीमा बोबडे, बाळासाहेब ओव्हाळ, अंबरनाथ कांबळे, प्रमोद ताम्हणकर, राजू लोखंडे यांचा समावेश आहे.
माजी शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, शहर उपाध्यक्ष गणेश लंगोटे, समीर जावळकर, चेतन बेंद्रे, नीलेश शिंदे, दीपक मेवाणी, धनराज आसवानी, रोहित गोलांडे, जितू पेहलानी, अक्षय चव्हाण, अमित भोईटे, मंगेश नढे, प्रकाश लोहार, वैजनाथ शिरसाट, दिलीप तनपुरे, पूजा प्रशांत आगज्ञान, मनीषा शिंदे, रेखा माने, अनिता तांबे, सारिका कस्पटे, सीमा बोरसे, दीपाली कणसे, सारिका भंडलकर, तेजश्री ढोरे, पायल पसरणीकर यांच्यावर कारवाई होणार आहे.
१६ नगरसेवक पराभूत, नेत्यांमुळे फटका
महापालिका निवडणुकीत भाजपचे चार आमदार, पदाधिकारी, जुने आणि नवीन असा वाद यामुळे भाजपला फटका बसल्याचे निकालावरून दिसून येते. निवडणुकीत भाजपचे १६ नगरसेवक पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने २० नवोदितांना संधी दिली होती. ऐनवेळी पक्षात आलेल्या मीनल यादव, प्रसाद शेट्टी, सद्गुरू कदम, उषा वाघेरे यांना उमेदवारी दिली होती. भाजपची ऐनवेळीची खेळीही अपयशी ठरली. पक्षातीलच पदाधिकाऱ्यांच्या पराभवास कारणीभूत असणाऱ्या नेत्यांनाही समज देणार असल्याचे समजते.