Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:49 PM2021-05-17T17:49:32+5:302021-05-17T18:09:54+5:30

तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या आहेत.

तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या आहेत.

राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे.

त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचून आढावा घेतला.

मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. (aditya thackeray appeals mumbaikars to stay home safely during cyclone tauktae)

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या. वादळाची तीव्रता सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ११४ किमीच्या वेगाने रेकॉर्डब्रेक करत मुंबईवर आदळले आहे.

आतापर्यंतचे हे सर्वात मोठे चक्रीवादळ असून झालेल्या परिणामांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेय.

चक्रावादळाची तीव्रता ओळखून एनडीआरएफची टीमचही तय्यार झाली आहे. एनडीआरएफचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी मुंबईला पोहोचले आहेत.

भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अद्यापही समुद्रातच अडकलेली आहे. या बोटीवर एकूण 6 जण अडकले असल्याचे समजते.

वादळाच्या तडाख्यात ही बोट सापडली असून या स्थितीत मदतकार्यदेखील अशक्य होऊन बसले आहे. (Bhainder's New Help Mary fishing boat is still at sea; 6 people stuck, relief work impossible)

या बोटीवर जस्टीन मिरांडा ह्या नाखवासह 5 खलाशी, असे एकूण 6 जण आहेत. दुपारी जस्टीन यांचा वायरलेस वरून संपर्क झाला होता. त्यावेळी ते किनाऱ्यापासून 11 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 23 किमी खोल समुद्रात अडकले आहेत, असे समजले.

त्यांच्या जीवाला धोका असून समुद्रातील खडकाला नांगर टाकून हे मच्छीमार जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. वादळामुळे त्यांची बोटही ओढली जात होती. ती केवळ नांगराच्या सहाय्यने तग धरून होती.

मात्र, नांगराचा दोर तुटल्याने खवळलेल्या समुद्रातच बोट घेऊन आता हे मच्छीमार किनाऱ्याला येण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी दिली आहे.

दरम्यान, वादळाने समुद्र खवळला असून बोटीवरील 6 जण सुखरूप यावेत ह्यासाठी पाली गावातील ग्रामस्थ व मिरांडा कुटुंबीय परमेश्वराकडे सातत्याने प्रार्थना करत आहेत.

मुंबईतील काही भागांत झाडे उन्मळून पडलीआहेत, समुद्रात लाटांनी आक्राळ-विक्राळ रुप धारण केलं आहे. त्यामुळे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलंय

मुंबईतील मरीन लाईन परिसराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये लाटांचे रौद्र रुप दिसून येते