'आमची मुंबई... आमची राहिली नाही, कोरोनामुळे स्वप्ननगरीत १००० जणांचा मृत्यू'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 10:16 PM2020-05-25T22:16:29+5:302020-05-25T22:24:15+5:30

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सोमवारी एका दिवसात राज्यभरातून ११८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात सोमवारी ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १६९५ झाली आहे. या एकूण मृत्यूंपैकी तब्बल १ हजार मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. त्यामुळे, मुंबईकरांसाठी ही चितेची बाब आहे.

सोमवारी नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८ मृत्यू झाले आहेत.

मुंबईतील मृतांचा आकडा १००० झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन आमची मुंबई... आमची राहिली नाही... असे भावनिक ट्विट केले आहे. तसेच, वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.

आमदार नितेश राणे हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारला कोरोनाविरुद्धच्या लढाईत अपयश आल्याचं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगत आहेत.

भाजपाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनातही राणे यांनी सहभाग घेतला होता. तर, सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर ते कोरोनावरुन टीकास्त्र सोडत आहेत.

नितेश यांनी आज मुंबईतील मृतांचा आकडा १ हजार झाल्याचे सांगत स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनामृत्युची नोंद झाल्याचं म्हटलं आहे.

जे शहर कधीच झोपत नाही, आज त्याच मुंबईतील रुग्णालयात आज झोपण्यासाठी रुग्णांना बेड नाहीत, ही शोकांतिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.

अखेर आमची मुंबई... आमची राहिली नाही... असे म्हणत राणेंनी दु:ख व्यक्त केलं आहे.