CoronaVirus In Maharashtra: ...म्हणून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला; केंद्रीय पथकाचा अहवाल, राज्य सरकारला दिली 'ही' सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:34 AM2021-03-08T10:34:35+5:302021-03-08T10:43:47+5:30

आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ११,१४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,१९,७२७ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ४७८ झाला आहे. शनिवारी १०,१८७ बाधितांचे निदान झाले होते.

रविवारी दिवसभरात ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २०,६८,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के झाले आहे. सध्या ९७,९८३ रुग्ण उपचाराधीन आहेत अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. सध्या राज्यातील मृत्युदर २.३६ टक्के आहे.

रविवारी दिवसभरातील ३८ मृत्यूंमध्ये मुंबई ४, ठाणे १, नवी मुंबई मनपा २, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा २, मालेगाव १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव २, पुणे ३, पुणे मनपा २, सोलापूर १, सांगली मिरज कुपवाड मनपा २, औरंगाबाद मनपा ३, लातूर १, नांदेड १, बीड १, अकोला मनपा १, अमरावती १, अमरावती मनपा २, नागपूर १ आणि अन्य राज्य/ देशातील १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होम कॉरण्टाइन, तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारण्टाइनमध्ये आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबई शहरात रविवारी एका दिवसात १३६१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतीली कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता ३,३५,५६९ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ११५०४ झाली आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने सांगितलं.

महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने १ आणि २ मार्च रोजी हा कोरोना पाहणी दौरा केला.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावर लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घ्यावा, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा आणि लसीकरण सुरू ठेवावे असंही केंद्रीय पथकाने सुचवलं आहे.