Ganesh Chaturthi: गणेशोत्सव स्पेशल: नोकरी सोडून इंजिनिअर-बँकर बनले मूर्तीकार, कमवतात लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:08 PM2022-09-01T15:08:41+5:302022-09-01T15:14:10+5:30

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रातील पेण तालुक्यात आहे भारतातील सर्वात मोठे मूर्ती मार्केट. वर्षाला 3 कोटी मूर्त्या, 25 ते 30 लाख लोकांना मिळतो रोजगार.

India Ganpati Market: तुम्ही कधी हमरापूर गावाचे नाव ऐकले आहे का? ऐकले नसेल, पण हे गाव खूप खास आहे. 100 वर्षांपूर्वी येथील एका कारागिराने मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू केले. आता गावात दरवर्षी 3 कोटी मूर्ती बनवल्या जातात आणि यातून वर्षाला 80 ते 90 कोटींचा व्यवसाय होतो. 418 घरे असलेल्या हमरापूरमध्ये मूर्त्या घडवण्याचे 500 कारखाने आहेत, या गावाला भारतातील गणपती मार्केट असेही म्हटले जाते.

पेण तालुका रायगड जिल्ह्यात पुण्यापासून 120 किमी अंतरावर आहे. यातच हे खास हमरापूर गाव आहे. गावात प्रवेश करताच रस्त्याच्या कडेला बांधलेली गोदामे दिसतात. प्रत्येकाच्या बाहेर अनेक दिवस ट्रक उभे असतात. त्यात लहान-मोठ्या मूर्त्या दिसतात. या गावातील मूर्त्या घडवणारे कारागिर इतके व्यस्त असतात की, त्यांच्याकडे बोलायला वेळ नसतो.

गावात जाण्यासाठी सुमारे 14 फूट रुंद रस्ता आहे, यावर दीड ते दोन किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळतात. या गर्दीतील बहुतांश लोक मुंबई आणि इतर भागातून मूर्ती खरेदी करण्यासाठी येथे येतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जापान, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये हमरापूरच्या मूर्तींना मागणी आहे. जहाज किंवा विमानाने या मूर्त्या परदेशात पाठवल्या जातात.

हमरापूर गावातील प्रत्येक घरात किमान एक कारागिर आहे. यातील बहुतेक लोकांनी आपल्या घराचे गोदाम आणि कारखान्यात रूपांतर केले आहे. काही वर्षांपूर्वी इतर शहरांमध्ये कामासाठी गेलेल्या अनेक लोकांनी परत गावी येऊन गणपती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. गावातल इंजिनीअरिंग केलेली मुलेही मुर्ती घडवण्याचे काम करतात. कारण, त्यांना गावातच पगारापेक्षा जास्त पैसा मिळतो.

गावातील 10 हजारांहून अधिक लोक मूर्ती बनवण्याचे काम करतात. यापैकी काहींच्या 3-4 पिढ्या याच कामात गुंतल्या आहेत. गावातील शिल्पकारांचे संघटनादेखील आहे. गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती तयार करणे, पॉलिश करणे, अंतिम टच देणे, त्यांना कृत्रिम दागिन्यांनी सजवणे अशी कामे वेगवेगळे लोक करतात. एकट्या हमरापूर गावात 10 हजारांहून अधिक लोक या व्यवसायाशी निगडीत आहेत.

मूर्तींची वाहतूक आणि देखभाल करणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश केला तर ही संख्या 30 हजार होईल. संपूर्ण पेण तालुका आणि बाहेरील लोक जोडले तर गावात बनवलेल्या मूर्तींमधून 25 ते 30 लाख लोकांना रोजगार मिळतो. त्यामध्ये केरळ, गुजरात आणि राजस्थानमधील लोकांचाही समावेश आहे, जे मूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नारळाच्या भुसापासून बनवलेले कबल, शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस तयार करतात.

येथील मूर्तींच्या किमतीमध्येही फार फरकत आहे. इतर शहरांमध्ये गणपतीची मूर्ती ज्या किमतीत मिळत असेल, त्याच्या अर्ध्या किमतीत या गावात मिळते. म्हणूनच दूरवरुन लोक मूर्त्या खरेदी करण्यासाठी गावात येतात. मूर्तींची किंमत आकार आणि इतर सजावटीनुसार ठरते.

इथे शंभर रुपयांपासून दीड-दोन लाख रुपयांपर्यंतच्या मूर्त्या आहेत. येथे बनवलेल्या मूर्ती मुंबई, सुरत, दिल्ली, मेरठसह इतर शहरांमध्ये जातात, त्यानंतर किंमतीत 15-20% वाढ होते. पेणमध्ये 500 रुपयांना मिळणारी मूर्ती पुण्यात 1500 रुपयांची होते.