"जोपर्यंत सीमेवर दहशतवाद थांबत नाही, तोवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य"

India Vs. Pakistan Match : क्रिकेट महत्त्वाचं नाही, आपले जवान महत्त्वाचे; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केलं मत

गेल्या अनेक वर्षांपासून काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोडल्या तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांच्या मालिकांचं आयोजन करण्यात येत नाहीये.

काही जणांकडून या मालिका आयोजित करण्यास सांगितलं जात आहे तर काही जणांकडून या मालिकांना विरोधही होत आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि लोकसभेचे खासदार गौतम गंभीर यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यास विरोध केला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर दहशतवाद बंद केला जात नाही तोवर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने आयोजित केले जाऊ नये, असं त्यांनी सांगितलं.

गौतम गंभीर यांनी आएएनएसला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. क्रिकेट आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी आमचे सीमेवर रक्षण करणारे जवान महत्त्वाचे असल्याचं गंभीर यांनी सांगितलं.

दरम्यान, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. तसंच आपल्या देशात वाढत असलेल्या दहशतवादावर आपण वचक ठेवला असल्याचा दावा पाकिस्तानकडून सातत्यानं करण्यात येत आहे. परंतु पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत जम्मू काश्मीरमध्ये सोडलं जातं.

भारतीय संघाच्या खेळाडूंना खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. परंतु जवान हे निस्वार्थ होऊन देशसेवा करत असतात, असंही गंभीर म्हणाले.

मी गंभीर म्हणून देशाकडून खेळताना विजय मिळवून देशावर कोणतेही उपकार केलेल नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.

परंतु अशा व्यक्तींकडे पाहा जे सियाचिन किंवा पाकिस्तान सीमेवर राहून आपल्या देशाचं रक्षण करतात. कमी वेतनातही आपलं कर्तव्य बजावत आपला जीव धोक्यात घालत असतात. खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे महान नायक तेच आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गौतम गंभीर यांना लहानपणापासूच भारतीय लष्करात सामील होण्याची इच्छा होती.

परंतु त्यांनी जेव्हा रणजी क्रिकेट सामन्यात खेळण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास समजूत काढली होती.

"देशासाठी उभं राहण्याचा एक प्रकार होता आणि म्हणूनच मी त्यासाठी तयार झालो," असं गंभीर यांनी आपल्या आई-वडिलांची ती आठवण सांगताना म्हटलं.

त्यांचं लष्कर आणि सैन्यासाठी प्रेम कायम आहे. सैनिकांचा गणवेश हा पवित्र असतो. तो गणवेश परिधान करणारे जवान आपलं रक्त सांडून देशाची सेवा करतात, असंही त्यांनी नमूद केलं.

अशी व्यक्ती जी याप्रकारे काही करू शकत नसेल त्यानं हा गणवेश परिधान करू नये, असंही गंभीर म्हणाले.

जोपर्यंत पाकिस्तान सीमेवर दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोवर भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू नये असंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.