भारताच्या 8 क्रिकेटपटूंनी केलंय अन्य देशाचे प्रतिनिधित्व; नावं जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

गुल मोहम्मद - यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. 1921मध्ये जन्मलेल्या गुल मोहम्मद यांनी 1938मध्ये उत्तर भारत संघाकडून रणजी स्पर्धेत पदार्पण केले. डावखुऱ्या फलंदाजानं त्यानंतर 1946 मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यांनी भारताकडून 8 कसोटी सामने खेळले. 1955 ला त्यांनी पाकिस्तानकडून एकमेव कसोटी सामना खेळला.

आमीर इलाही - बदोडाकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या इलाही यांनी 1947मध्ये भारताकडून एकमेव कसोटी सामना खेळला. त्यानंतर 1952-53 या कालावधीत पाकिस्तानविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले. त्यापैकी एक सामना भारताविरुद्धचा होता. त्या सामन्यात त्यांनी झुल्फीकार अहमदसोबत 104 धावांची भागीदारी केली. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी 193 विकेट्स घेतल्या. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर बदोडानं 1946-47मध्ये जेतेपद पटकावलं.

अब्दुल हाफीझ कर्दार - कर्दार यांनी 1946च्या इंग्लंड दौऱ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानकडून 23 कसोटी सामने खेळले.

कृष्णा चंद्रन - केरळकडून लिस्ट ए क्रिकेट खेळणाऱ्या चंद्रननं संयुक्त अरब अमिरातीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यूएईकडून खेळणारा चंद्रन हा केरळचा पहिलाच खेळाडू ठरला. यूएईकडून त्यानं 12 वन डे सामन्यांत 7 विकेट्स आणि 134 धावा केल्या.

स्वप्नील पाटील - मुंबईच्या या खेळाडूनं 19 व 22 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो संयुक्त अरब अमिराती येथे कामासाठी गेला आणि तेथे त्याला युएई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानं 13 वन डे, 18 ट्वेंटी सामन्यांत युएईचे प्रतिनिधित्व केले आहे.

मुनीस अन्सारी - लसिथ मलिंगासारखी गोलंदाजी शैली असलेल्या या खेळाडूला टीम इंडियाच्या सराव सत्रात बोलावण्यात आले होते. 2015मध्ये त्यानं ओमान संघाकडून ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतही तो खेळला होता.

जीत रावल - गुजरातच्या 15 व 17 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूनं न्यूझीलंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

शक्ती गौचॅन - नेपाळच्या या खेळाडूनं मुंबईच्या 15 व 17 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं नेपाळकडून 2005च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत इटलीविरुद्ध 106 धावा कुटल्या होत्या. नेपाळकडून आंतरराष्ट्रीय शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता.