Death Anniversary : एक अभिनेत्री जी देव आनंद यांच्यासाठी आजन्म राहिली अविवाहित, वाचा रोचक किस्से

By रूपाली मुधोळकर | Published: December 3, 2020 02:17 PM2020-12-03T14:17:31+5:302020-12-03T14:30:11+5:30

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी 2011 साली आजच्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला जगाला अलविदा म्हटले होते.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी 2011 साली आजच्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला जगाला अलविदा म्हटले होते. 3 डिसेंबर 2011 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी या सदाबाहर अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. लंडनच्या दा वॉशिंग्टन मेयफर हॉटेलात हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते.

26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये त्यांचा जन्म झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत देव आनंद यांना ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणून ओळखले जाते. आपल्या आत्मकथेची सुरूवातही त्यांनी ‘रोमांसिंग विद लाईफ’या शीर्षकाने केली आहे. आज देव आनंद आपल्यात नाहीत. पण त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या रूपातील एक चिरतरूण अभिनेता आजही सर्व सिनेरसिकांच्या मनात जिवंत आहे.

चॉकलेट हिरो देव आनंद यांना आयुष्यभर चिरतरूण राहण्याचा आनंद घेता आला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. देव आनंद यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. त्यातील सुरैय्या यांच्यासोबतचे प्रेमप्रकरण गाजले.

आपल्या महाविद्यालयीन काळात इतिहासाच्या प्राध्यापकाच्या मुलीशी त्यांचे एकतर्फी प्रेमप्रकरण होते. त्यांना ती मुलगी खूप आवडायची. परंतु तिला सांगण्याचे धाडस देव आनंद यांच्यात नव्हते. त्यामुळे त्यांचे हे पहिले प्रेम गुलदस्त्यात राहिले. ‘रोमान्सिंग विथ लाईफ’ या त्यांच्या आत्मचरित्रात देव आनंद यांनी आपल्या प्रेम प्रकरणांबाबत सविस्तर लिहिले आहे.

वयाच्या 25 व्या वर्षी म्हणजे 1948 साली देव आनंद यांनी सुरैय्या यांच्यासमवेत ‘विद्या’ या चित्रपटात काम केले. देव आनंद यांच्या अनुसार सुरैय्या यांची भेट ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर झाली. यावेळी त्यांच्या मनात आकर्षण झाले. तो काळ सुरैय्या यांचा होता. आकर्षणाचे रुपांतर प्रेमात झाले. देव आनंद त्यावेळी मुंबईच्या चर्चगेटहून चालत मरीन ड्राईव्ह येथील सुरैय्या यांच्या घरापर्यंत जायचे. त्यावेळी सुरैय्या यांना पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची. सुरैय्या यांच्या आईला या दोघांचे प्रेम पसंत होते, मात्र सुरैय्या यांच्या आजीला हे आवडले नाही.

त्या काळात इतरत्र फिरता येत नसायचे. केवळ सेटवरच एकमेकांशी बोलणे व्हायचे. देव आनंद आणि सुरैय्या यांनी लग्न करावयाचे ठरविले, मात्र सुरैय्या यांच्या आजीने याला विरोध केला. आजीच्या निर्णयाविरुद्ध जाण्यास सुरैय्यानी नकार दिला होता. त्यावेळी अनेक जण हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करायचे. या दोघांच्या प्रेमाबाबतही माध्यमांनी जोरदार अफवा उठविल्या. एके दिवशी सुरैय्या यांनी देव आनंद यांना नकार कळविला. त्यानंतर देव आनंद खूप रडले होते.

देव आनंद यांनी नंतर कल्पना कार्तिक यांच्यासमवेत लग्न केले. या दोघांनी आंधियाँ, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नं. 44 हे चित्रपट केले. टॅक्सी ड्रायव्हरच्या सेटवर त्यांनी लग्न केले. काही दिवसानंतर कल्पना कार्तिक चित्रपटांमधून गायब झाली. देव आनंद यांनी आपले सारे ध्याय चित्रपट निर्मितीकडे वळविले. कल्पना यांच्यापासून त्यांना दोन मुले झाली. सुनील आणि देविना.

1970 साली देव आनंद यांनी हरे रामा हरे कृष्णा हा चित्रपट काढला. यामध्ये झीनत अमानला त्यांनी संधी दिली. देव आनंद यांनी झीनतला सिगारेट दिली. सिगारेट पिताना झीनतने ज्या पद्धतीने देव आनंद यांच्याकडे पाहिले, त्यावेळी देव तिच्यावर फिदा झाले. एका पार्टीत राज कपूरसोबत झीनतला पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यावेळी ही आपली झीनत राहिली नाही, म्हणून परतले.

आयर्लंडमधील एका मुलीसोबत देव आनंद यांचे प्रेमप्रकरण होते, असे म्हणतात. त्यांच्या या अफेअरची खर त्यांची पत्नी कल्पना यांनाही लागली होती. रिपोर्टनुसार, या मुलीवरुन देव आणि कल्पना यांचे ब-याचवेळा खटकेही उडायचे.

देव आनंद यांचे वडील वकील होते. पण देव आनंद यांना अभिनयात रस होता. हिरो बनण्याच्या ध्यासापोटी देव आनंद मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ 30 रुपये होते. ना ओळख, ना डोक्यावर छत.

30 रुपये संपल्यानंतर देव आनंद यांनी मिल्ट्री सेंसर आॅफिसमध्ये 165 रूपये मासिक वेतनावर काम सुरु केले. सुमारे वर्षभर त्यांनी या ठिकाणी नोकरी केली. याठिकाणी त्यांना सैनिकांची पत्रे वाचण्याची कामे करावी लागायची. पत्रामध्ये काही विनाकारणची माहिती असेल तर त्या पत्राचे सेन्सॉर करण्याचे त्यांचे काम होते.

मिलिट्री सेन्सॉर आॅफिसमध्ये काम केल्यानंतर देव आनंद यांनी काही काळ अकाऊंटींग फर्ममध्येही नोकरी केली होती. याठिकाणीही देवसाहेब क्लर्क म्हणूनच काम करत होते. अनेक संघषार्नंतर ‘हम एक है’ या चित्रपटातून देव आनंद यांना ब्रेक मिळाला. यानंतर देव आनंद यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

पांढरा शर्ट आणि काळा कोट ही फॅशन देवानंद यांच्यामुळेच फेमस झाली होती. देव आनंद यांना काळ्या कोटमध्ये पाहून मुली देहभान विसरायच्या. अनेक मुलींनी त्यांच्यावर भाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे देव आनंद यांच्या काळ्या कोटवर कोर्टाने बंदी लादली होती, असे म्हटले जाते.