जिंतूर-औंढा मार्गावर कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; वसमतच्या दोन तरुणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 19:57 IST2026-04-05T19:56:37+5:302026-04-05T19:57:49+5:30
या घटनेमुळे संपूर्ण वसमत शहरात शोककळा पसरली आहे.

जिंतूर-औंढा मार्गावर कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; वसमतच्या दोन तरुणांचा मृत्यू
वसमत: जिंतूर-औंढा नागनाथ महामार्गावर भोगाव फाट्याजवळ रविवारी दुपारी कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात वसमत शहरातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वसमत शहरात शोककळा पसरली आहे.
कार आणि दुचाकीची जोरदार धडक
वसमत येथील शहरपेठ भागातील रहिवासी रितेश विष्णुपंथ टाक (वय ४०) आणि स्वर्णकार कॉलनीतील मयूर शहाणे (वय ३८) हे दोघे रविवारी(५ एप्रिल) दुपारी सुमारे १.३० वाजता दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर-औंढा मार्गावरील भोगाव गावाजवळ समोरून येणाऱ्या कारशी त्यांच्या दुचाकीची अत्यंत भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.
एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात मयूर शहाणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रितेश टाक हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी रितेश टाक यांना जिंतूर येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात येत होते. मात्र, परभणीला पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
वसमत शहरात शोककळा
अवघ्या काही तासांच्या अंतराने वसमत शहरातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. मनमिळावू स्वभावामुळे ओळख असलेल्या या दोघांच्या निधनामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.