महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:52 IST2025-06-08T06:52:38+5:302025-06-08T06:52:45+5:30
Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात लेखातून साधला निशाणा, म्हणाले - आता वेळ बिहारची; निवडणूक आयाेगासह भाजपने केला जाेरदार पलटवार

महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
नवी दिल्ली - २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली.
राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला ‘मॅच-फिक्सिंग महाराष्ट्र’ हा लेख एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यात त्यांनी गंभीर आराेप केले. राहुल गांधी यांचे आरोप निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळून लावले. अपेक्षित निकाल न आल्यानंतर आयोगास बदनाम करणे हे निरर्थक व हास्यास्पद आहे, असे सूत्रांनी म्हटले. निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर छाननी झाली तेव्हा काँग्रेसच्या वतीने कोणताही आक्षेप नोंदविण्यात आला नव्हता. निवडणूक प्रक्रियेबाबत चुकीची माहिती प्रसारित करणे हा निवडणूक काळात नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींचा अपमान आहे तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोबल तोडणारा आहे. असे आरोप कायद्याच्या राज्याचा अवमान आहे, असेही सूत्रांनी म्हटले.
‘मतदारांचे आकडे फुगविले’
राहुल म्हणतात की, महाराष्ट्रातील मतदारांचे आकडे फुगविण्यात आले. या राज्यात २०१९ मध्ये ८.९८ कोटी मतदार होते. पुढील पाच वर्षांत ती ९.२९ कोटी झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर फक्त पाच महिन्यांतच, नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील मतदारसंख्या थेट ९.७० कोटींवर गेली. हा आकडा महाराष्ट्रातील एकूण ९.५४ कोटी प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त होता. ही सर्व सरकारी आकडेवारीच आहे.
मतदान टक्केवारी वाढविली
राहुल यांनी सांगितले की, २०२४मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते; पण त्यानंतरही हे आकडे वाढत गेले. मतदानाची अंतिम टक्केवारी ६६.०५ टक्के असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगण्यात आले. म्हणजे या मतांमध्ये ७.८३ टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ १२,००० बूथमध्ये नव्या मतदारांची भर पडली. त्यातील ८५ मतदारसंत भाजपला विजय मिळाला होता.
निवडणूक आयाेगाच्या उत्तरावर राहुल गांधी यांचा पुन्हा पलटवार
‘मॅच फिक्सिंग’चा आरोप आयोगाने फेटाळून लावल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा पलटवार केला असून, उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेचे संरक्षण होणार नाही, असे सुनावले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये राहुल यांनी म्हटले की, ‘प्रिय ईसी (निवडणूक आयोग), तुम्ही घटनात्मक संस्था आहात. मध्यस्थांना विना स्वाक्षरीचे मोघम निवेदन देणे हा गंभीर प्रश्नांवर उत्तर देण्याचा मार्ग नव्हे. तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर माझ्या लेखाला उत्तर देण्यासाठी अलीकडील लोकसभा व विधानसभेच्या महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील मतदार याद्या सर्वंकष व यंत्राद्वारे वाचता येण्याजोग्या (मशीन-रिडेबल) स्वरूपात जारी करा. त्याचप्रमाणे सायंकाळी ५ वाजेनंतरचे सर्व मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजही जारी करा.’
राहुल गांधी यांनी सांगितलेले निवडणुकांतील गैरप्रकारांचे टप्पे
टप्पा १ : निवडणूक आयोगातील नियुक्तीसाठीच्या पॅनेलचे स्वरूपच बदला
टप्पा २ : बनावट मतदारांची भर घाला
टप्पा ३ : मतदानाचा टक्का कृत्रिमरीत्या वाढवा
टप्पा ४ : जिथे भाजपला विजय हवा तिथेच बोगस मतदान घडवा
टप्पा ५ : सर्व पुरावे लपवा
राहुल गांधी कसे वागतात याचे नड्डा यांनी सांगितलेले पाच टप्पे
टप्पा १ : काँग्रेस पक्ष सातत्याने पराभूत होतो, कारण त्यांचे वागणेच विचित्र असते.
टप्पा २ : राहुल गांधी अजब गोष्टी सांगतात.
टप्पा ३ : सर्व निष्कर्ष, आकडेवारीकडे दुर्लक्ष.
टप्पा ४ : कोणताही ठोस पुरावा नसताना विविध यंत्रणांची बदनामी करतात.
टप्पा ५ : बातम्यांमध्ये झळकण्याची इच्छा.
बनावट कथानक तयार करण्याचा आराखडा
राहुल गांधी यांनी लिहिलेला लेख म्हणजे बनावट कथानक तयार करण्याचा आराखडा तसेच निवडणुकांमध्ये सतत होत असलेल्या पराभवांमुळे आलेल्या नैराश्याचे प्रतीक आहे. राहुल गांधी हे वारंवार खोट्या गोष्टी पसरवतात.
- जगतप्रकाश नड्डा,
केंद्रीय मंत्री व भाजपचे अध्यक्ष
राहुल गांधी यांना खाेटे बाेलण्याची सवय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीबाबत घेतलेल्या आक्षेपावर आयोगाने आकडेवारीसह प्रमाण दिले आहे; परंतु राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. रोज खोटे बोलले की लोकांना खरे वाटते असे त्यांना वाते. ते जे बोलतात ते त्यांनाही माहीत नसते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री