दिल्लीतील बैठक सीमाप्रश्नासाठी नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी; बोम्मई यांचे घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 10:17 IST2022-12-21T10:15:42+5:302022-12-21T10:17:30+5:30

बेळगावातील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या आणि एच के पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

meeting in delhi was not for the border question but for law and order said karnataka cm basavaraj bommai | दिल्लीतील बैठक सीमाप्रश्नासाठी नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी; बोम्मई यांचे घुमजाव

दिल्लीतील बैठक सीमाप्रश्नासाठी नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी; बोम्मई यांचे घुमजाव

प्रकाश बेळगोजी, बेळगाव: दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा  सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.

बेळगावातील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या आणि एच के पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. विरोधकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बेळगाव प्रश्नावर दिल्ली बैठकीवरून अनेक प्रश्न विचारून भंबेरी उडवून दिली.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज  बोम्मई यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अहवालावरून  कर्नाटक विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षाने बसवराज बोम्मई यांना चांगलेच धारेवर धरले. विधान सभेत सीमा प्रश्न संपला आहे असं तुम्ही वक्तव्य करता आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीला तुम्ही का उपस्थित रहाता? असा सवाल करत सिद्धरामयांनी त्यांना चांगलेच खडसावले. त्याचबरोबर सीमासमन्वयासाठी तीन तीन मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा तुम्ही निर्णय का मान्य केला ? दिल्ली  बैठकीत जातेवेळी विरोधकांना का विश्वासात घेतला नाही? विरोधकांशी का चर्चा केली  नाही असाही  सवाल त्यांनी केला.

कर्नाटकात सीमाप्रश्नासाठी विरोधीपक्षासह सर्वपक्षीय एकत्र असताना  तुम्ही केवळ एकटेच जाऊन कसं काय सांगता? सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या नव्हे तर संसदेच्या कार्यक्षेत्रात येतो हे का बैठकीत सांगितले नाही? असाही प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला गेला. त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयातून हा प्रश्न काढून फक्त संसदेच्याच कार्यक्षेत्रात असावा असाही विधान सभेत विरोधकांचा सूर होता.ट्विटर तुमचं नाही असा खुलासा तुम्ही का केला असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावलेली बैठक कायदा आणि सुव्यवस्थेसाठी होती तर तुम्ही दिल्लीत किंवा बेंगलोरला येऊन पत्रकार परिषद घेऊन तसे का जाहीर केला नाही? दिल्लीतील बैठक बेळगाव सीमा प्रश्नासाठीच होती असा सर्वत्र संदेश गेला असताना तुम्ही का गप्प बसला असाही प्रश्न विरोधकांनी केला.

पण एकंदर या सगळ्या चर्चेत अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना सर्वपक्षीय नेत्यांनीच सावरले, आणि एक अनोखा एकोपा कर्नाटक विधिमंडळाने सीमाप्रश्नाच्या बाबतीत दाखवून दिला. यावरून महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी धडा घेण्याची गरज आहे, कारण सीमाप्रश्नावर कर्नाटकातले सर्व पक्ष एकत्र येतात मात्र महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकमेकाची ऊनिधुनी काढण्यात धन्यता मानतात त्यामुळेसीमा भागातील लोकांची महाराष्ट्रातील नेत्यांच्याकडून उपेक्षा होते त्याचबरोबर अपेक्षा भंगही होतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: meeting in delhi was not for the border question but for law and order said karnataka cm basavaraj bommai