Maharashtra Election 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; बंडाचा झेंडा फडकवत ३५० पदाधिकारी आणि ३६ नगरसेवकांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:23 IST2019-10-15T12:28:01+5:302019-10-15T13:23:42+5:30
Nashik Election 2019 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती आहे.

Maharashtra Election 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; बंडाचा झेंडा फडकवत ३५० पदाधिकारी आणि ३६ नगरसेवकांचा राजीनामा
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नाशकात मोठा धक्का बसला आहे. येथील शिवसेनेच्या 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठीशिवसेना-भाजपाची युती आहे. त्यामुळे जागा वाटपा दरम्यान नाशिक पश्चिम मतदार संघाची जागा शिवसेनेऐवजी भाजपाच्या वाट्याला गेली. त्यामुळे या मतदार संघातील शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना लाखाहून आधिक मताधिक्य याच मतदार संघातून मिळाले होते.
तरीही या मतदारसंघाची जागा शिवसेनेला न देता आमदार सीमा हिरे भाजपाच्या असल्याने त्यांना सोडण्यात आली. त्यामुळे येथील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी बंड करून एकत्र येत विलास शिंदे यांना रिंगणात उतरविले आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून युतीधर्म पाळावा, असे आवाहन करत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही या मतदारसंघात शिवसेनेकडून बंड कायम करण्यात आला होता.
या बंडामुळे सीमा हिरे यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करूनही बंडखोरांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शिवसेनेकडून कारवाई होण्याआधीच या मतदारसंघातील 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांनी आपले राजीनामे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी दिलेले राजीनामे स्वीकारले जाणार की त्यांची नाराजी दूर केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.