शेतकऱ्यांना कर्ज देण्यात रामटेक तालुक्यातील बँका उदासीन : कर्ज थकीत असल्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:02 IST2025-06-02T18:02:11+5:302025-06-02T18:02:54+5:30

Nagpur : रामटेक तालुक्यात पीककर्जाचे केवळ १० टक्के वाटप

Banks in Ramtek taluka are indifferent to providing loans to farmers: They pretend that the loans are overdue | शेतकऱ्यांना कर्ज देण्यात रामटेक तालुक्यातील बँका उदासीन : कर्ज थकीत असल्याची बतावणी

Banks in Ramtek taluka are indifferent to providing loans to farmers: They pretend that the loans are overdue

राहुल पेटकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक :
सन २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी रामटेक तालुक्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना आजवर केवळ १० टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत असल्याचे कारण बैंक अधिकारी पुढे करीत असल्याने बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास उदासीन आहेत. त्यामुळे जूनमध्ये पीककर्ज वाटपाचा वेग वाढेल आणि बँका त्यांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकांच्या मशागतीसाठी पैसे मिळतील, ही शक्यता मावळल्यागत आहे. 


नागपूर जिल्हा सहकारी बँकेला कर्ज वाटपाचे १७० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना त्यांनी ८३ शेतकऱ्यांना १४२.५८ लाख रुपये कर्ज वाटप केले. देवलापार शाखेने ६० लाखांपैकी २३ शेतकऱ्यांना ४९.९३ लाख रुपये कर्ज दिले. बैंक ऑफ बडोदाच्या रामटेक शाखेने ६७१.१५ लाखांचे उद्दिष्ट असताना १९ शेतकऱ्यांना ३५ लाखांचे कर्ज दिले. बैंक ऑफ इंडियाच्या देवलापार शाखेने २४७.४० लाखांचे उद्दिष्ट असताना ५९ शेतकऱ्यांना ६१.३२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. हिवराबाजार शाखेला ५२.३५ लाखांचे उद्दिष्ट असून, त्यांनी ५ शेतकऱ्यांना ३.९५ लाख रुपये कर्ज दिले. शीतलवाडी शाखेने ७९३.७० लाख रुपये उद्दिष्ट असताना ५८ शेतकऱ्यांना ७४ लाख रुपये, कांद्री शाखेने ३५५ लाख रुपये उद्दिष्ट असताना ४९ शेतकऱ्यांना ४४.३३ लाख रुपये, पतनी शाखेने ५१३ लाख रुपये उद्दिष्ट असताना ६९ शेतकऱ्यांना ७२.६९ लाख रुपये, मनसर शाखेला ४१९.२० लाखांचे उद्दिष्ट असताना त्यांनी ५० शेतकऱ्यांना ६२. ३३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.


बैंक ऑफ महाराष्ट्रच्या रामटेक शाखेने ३४४.८० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना ३७ शेतकऱ्यांना ५९.९२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. कॅनरा बँकेच्या मनसर शाखेने १,२६४ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना त्यांनी ३६ शेतकऱ्यांना ६० लाखांचे कर्ज दिले. पटगोवरी शाखेने ६०४ लाखांचे उद्दिष्ट असताना १५ शेतकऱ्यांना २८ लाखांचे कर्ज वाटप केले. एचडीएफसी बँकेच्या रामटेक शाखेने ९२ लाखांचे उद्दिष्ट असताना ५ शेतकऱ्यांना ७.०२ लाखांचे कर्ज वाटप केले.


स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या काचूरवाही शाखेने ४८८.८५ लाखांचे उद्दिष्ट असताना ५० शेतकऱ्यांना ८५.९२ लाखांचे कर्ज दिले. रामटेक शाखेने ८२० लाखांचे उद्दिष्ट असताना १०० शेतकऱ्यांना १५९.९७ लाखांचे कर्ज वाटप केले. युनियन बैंक ऑफ इंडियाच्या रामटेक शाखेने ७८० लाखांचे उद्दिष्ट असताना २३ शेतकऱ्यांना १९.६९ लाख रुपयांचे कर्ज दिले. युको बँकेच्या किट्स शाखेने ८८ लाखांचे उद्दिष्ट असताना एका शेतकऱ्याला १.२१ लाखाचे कर्ज दिले. रामटेक शाखेने १,२७६.६५ लाखांचे उद्दिष्ट असताना १० शेतकऱ्यांना १५.१५ लाखांचे कर्ज वाटप केले. ईसाफ, ईक्विटास व उत्कर्ष या बँका पीककर्ज वाटपात सहभागी नाहीत. 


कारवाई करणार कुणावर ?
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास हयगय करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सरकारी पातळीवरून वारंवार सांगितले जाते. मुळात राष्ट्रीयीकृत बँका केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. त्या राज्य सरकारचे निर्णय मनावर घेत नाही. आजवर अनेक बँकांनी पीककर्ज वाटपात अनियमिता केली आहे. मात्र, कुठल्याही बँकेवर राज्य सरकारने कारवाई केल्याचे उदाहण नाही, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी दिली. त्यातच सिबीलचा नियम शेतकऱ्यांना लावला असून, त्यांना पैशासाठी सावकारांच्या दरात जावे लागत आहे.


कर्ज थकीत राहण्याची कारणे
विधानसभा निवडणूक काळात सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची देण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने काही शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली नाही. सत्ता स्थापन होताच नेत्यांनी शब्द फिरवला आणि शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या सूचना केल्या. ज्यांना पैशाची जुळवाजुळव करणे शक्य झाले, त्यांनी कर्जाची परतफेड केली, ज्यांना शक्य झाले नाही, त्यांचे कर्ज थकीत राहिले. शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल, एवढा दर मिळत नसल्याने कर्जबाजारीपण वाढत आहे. याला सरकारी धोरणे कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


७२३ शेतकऱ्यांना १,०१५.५८ लाख रुपयांचे कर्जवाटप
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रामटेक तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक बोलावली होती. तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांना १५ मेपर्यंत १०,१७७.८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असताना त्यांनी ७२३ शेतकऱ्यांना केवळ १,०१५.५८ लाख रुपांच्या कर्जाचे वाटप केल्याने उघड झाले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ही ९.९८ टक्के एवढी आहे. पीककर्ज वाटपात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे.


"पीककर्ज वाटपाची गती कमी आहे. १९ मे रोजी एक बैठक पार पडली. यात पीककर्ज देताना शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, काही त्रुटी, कमतरता असेल तर सांभाळून घ्यावे. पीककर्ज वाटपाला गती आली नाही तर पुन्हा बैठक घेऊन बँकांना ताकीद दिली जाईल."
- सुखदेव कोल्हे, सहायक उपनिबंधक, रामटेक


 

Web Title: Banks in Ramtek taluka are indifferent to providing loans to farmers: They pretend that the loans are overdue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.