शंभराव्या नाट्यसंमेलनाची सांगता पुन्हा पुढे, नियोजनासाठी शाखा पदाधिकाऱ्यांना वेळ हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:08 IST2026-04-15T13:08:10+5:302026-04-15T13:08:55+5:30
Mumbai News: पुण्यामध्ये २०२४ मध्ये सुरू झालेले शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सांगता सोहळा या महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते, पण आता त्या तारखाही बदलण्यात येणार आहेत.

शंभराव्या नाट्यसंमेलनाची सांगता पुन्हा पुढे, नियोजनासाठी शाखा पदाधिकाऱ्यांना वेळ हवा
मुंबई - पुण्यामध्ये २०२४ मध्ये सुरू झालेले शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सांगता सोहळा या महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते, पण आता त्या तारखाही बदलण्यात येणार आहेत.
रत्नागिरीमध्ये २४ ते २६ एप्रिल या कालावधीत शंभराव्या नाट्य संमेलनाचा तीन दिवसीय सांगता सोहळा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी अधिकृतपणे घोषित करण्यात आले. त्यामुळे रंगकर्मींसोबत रसिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पसरले. रत्नागिरीतील स्थानिक कलाकार आपली कला सादर करायला मिळणार असल्याने आनंदी होते, पण त्यांच्या आनंदावर पुन्हा विरजण पडले. ठरलेल्या तारखांना नाट्य संमेलन होणार नाही. मुख्य नाट्यसंमेलनाचा सोहळा ठरलेल्या तारखेला होणार नसल्याने त्यापूर्वी नियोजित असलेला बाल नाट्य महोत्सवही होणार नाही. या सर्व गोष्टींची, तसेच पुढील आयोजनाबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
रंगकर्मींमध्ये नाराजी नाट्यसंमेलन सांगता समारंभाचे भव्यदिव्य आयोजन करण्यासाठी तिथल्या शाखा पदाधिकाऱ्यांना वेळ हवा असल्याने त्यांनी संमेलन पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यामुळे तारीख बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण, उशीर होत असल्याने रंगकर्मींमध्ये नाराजी आहे.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची सभा लवकरच होणार आहे. त्यानंतर सांगता समारंभाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यानंतर बोरिवलीतील १०१वे नाट्यसंमेलन मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.
- अजित भुरे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद