“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:40 IST2026-01-25T12:39:37+5:302026-01-25T12:40:09+5:30
Sanjay Raut News: आम्ही बिहारमधील पाटणा येथे भव्य ३० मजली महाराष्ट्र भवन उभारू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट
Sanjay Raut News: बिहार सरकारने दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येबिहार भवन उभारण्याची घोषणा केली. बिहारच्या गृहनिर्माण विभागाचे सचिव कुमार रवी यांनी याबाबत माहिती देताना मुंबईमधील एलिफिस्टन इस्टेट, मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात हे बिहार भवन उभे राहणार असून, राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी ३१४ कोटी २० लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे, असे सांगितले. मुंबईतील बिहार भवनाच्या बांधणीला विरोध होऊ लागला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून टीका केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने मुंबईत बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धवसेना व मनसेने यावर आक्रमक भूमिका घेत त्यास विरोध केला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधणारच. राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का, अशी प्रतिक्रिया दिल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मुंबईत प्रस्तावित बिहार भवन बांधण्यावर भाष्य केले. भारतीय संविधानाने प्रत्येकाला देशात कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला आहे. हे संविधान आम्हालाही माहिती आहे. पण बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली भाषा अधिक संयमी आणि सौम्य असायला हवी होती. मुंबईत आधीच अनेक राज्यांची भवने आहेत, पण ज्या पद्धतीने बिहारचे मंत्री आव्हान देत आहेत, ते चुकीचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…
मुंबईची अवस्था समजून घ्या. तुम्हाला जागा हवीच असेल, तर गौतम अदानींकडून बाजारभावाने ती विकत घ्या. सरकारकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात जागा हवी असेल, तर आधी सांस्कृतिक देवाणघेवाण करा. महाराष्ट्रातील असंख्य लोकही बिहारला जातात, त्यांनाही तिथे राहण्याची सोय मिळायला हवी. मुंबईत जर जागा हवी असेल तर गौतम अदानींकडून बाजारभावाने घ्यावी. आम्ही देशाचे संविधान मानणारे लोक आहोत. तुमच्यासारखे लोक आम्ही नाहीत. मुंबईची अवस्था तुम्ही समजून घ्या. मुंबईत विनाकारण वातावरण बिघडेल असे वक्तव्य करू नका, असा थेट इशारा संजय राऊतांनी दिला.
आम्ही बिहामध्ये ३० मजली महाराष्ट्र भवन बांधू
तुम्हाला मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर त्यासाठी जमीन मुंबईचीच वापरावी लागेल, ती काही तुम्ही पाटण्यातून आणणार नाही. मग आमचीही मागणी आहे की, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईत जागा मागत आहात, त्याचप्रमाणे बिहार सरकारने पाटण्यातील गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी सारख्या मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्राला ५ ते ६ एकर जागा द्यावी. तिथे आम्ही ३० मजली भव्य महाराष्ट्र भवन उभारू. आम्हाला बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभं करायचे आहे. महाराष्ट्रातील असंख्य लोक बिहार, पाटण्याला जातात. आम्हालाही ३० मजली महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे, असं मी मानतो. जर बिहारी बांधव आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिथे स्वीकारलं पाहिजे. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. ती संपूर्ण देशभरात स्वीकारायला हवी. फक्त मुंबईवरच आक्रमण का, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.