मुंबई @ ३६; माेसमातील कमाल तापमानाचा पहिला उच्चांक, राज्यभरात चटके कायम; अकोल्याचा पारा ४४ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:13 IST2026-04-15T13:13:13+5:302026-04-15T13:13:29+5:30
Mumbai Weather: मंगळवारी मुंबईमध्ये एप्रिल महिन्यातील कमाल तापमानाचा पहिला उच्चांक नोंदविण्यात आला. ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाने अक्षरश: सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना चटके देत घाम काढला.

मुंबई @ ३६; माेसमातील कमाल तापमानाचा पहिला उच्चांक, राज्यभरात चटके कायम; अकोल्याचा पारा ४४ वर
मुंबई - मार्च महिन्यात आलेल्या दोन उष्णतेच्या लाटांनी आधीच हैराण केले असतानाच आता एप्रिल महिनाही प्रचंड ‘ताप’दायक ठरत आहे. मंगळवारी मुंबईमध्ये एप्रिल महिन्यातील कमाल तापमानाचा पहिला उच्चांक नोंदविण्यात आला. ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाने अक्षरश: सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना चटके देत घाम काढला. महत्त्वाचे म्हणजे हे तापदायक वातावरण शुक्रवारपर्यंत राहणार असून, तोवर मुंबईची भट्टी होणार आहे. दरम्यान, विदर्भात अकोला येथे ४४ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतात उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या हवामान बदलामुळे उत्तर पूर्वेकडून राज्यासह मुंबईकडे उष्ण वारे वाहत आहेत. या उष्ण वाऱ्याने राज्यभरातील शहरे तापली असून, कमाल तापमान ४० वर गेले आहे. विदर्भात तर कमाल तापमान ४२ वर गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कमाल तापमानाचा पारा ३२, ३३ होता. मंगळवारी मात्र पाऱ्याने थेट ३६ वर मजल मारली. दरम्यान, हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले, मंगळवारी मुंबईत नोंदविण्यात आलेले कमाल तापमान म्हणजे एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या मौसमातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. जेव्हा आर्द्रता कमी नोंदविले जाते, तेव्हा तापमान वाढते. जेव्हा आर्द्रता अधिक नोंदविली जाते, तेव्हा तापमान किंचित कमी होते.