राहुल नार्वेकरांविरोधात आधी आरोप, आता यू टर्न; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, "माहिती असतानाही त्यांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:07 IST2026-01-05T12:22:44+5:302026-01-05T13:07:59+5:30
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात दिलेली तक्रार जेडीएसने मागे घेतली.

राहुल नार्वेकरांविरोधात आधी आरोप, आता यू टर्न; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, "माहिती असतानाही त्यांनी..."
Rahul Narwekar: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेत कुलाबा परिसरात झालेला अभूतपूर्व गोंधळावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना राहुल नार्वेकर यांनी घटनात्मक पदाचा दुरुपयोग करत अडथळे आणले, अशी तक्रार जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि आम आदमी पक्षाने महापालिका उपायुक्तांकडे केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र जनता दलाने दिलेली तक्रार मागे घेतली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांनी नियमाप्रमाणे अर्ज भरल्याचे म्हटले.
३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा मतदारसंघातील प्रभाग २२५, २२६ आणि २२७ साठी अर्ज भरण्यास इच्छुक असलेले आप आणि जनता दलाचे उमेदवार निवडणूक कार्यालयात पोहोचले होते. उमेदवारांच्या दाव्यानुसार, ते दुपारीच कार्यालयात हजर होते आणि त्यांच्याकडे टोकन क्रमांकही होते. मात्र, सायंकाळी ५ वाजल्यानंतर वेळ संपल्याचे कारण देत निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांनी त्यांचे अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर राहुल नार्वेकर व निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.
यानंतर एकीकडे हा वाद सुरू असतानाच जनता दलाने या प्रकरणात नाट्यमय माघार घेतली. सुरुवातीला राहुल नार्वेकरांविरुद्ध तक्रार करणाऱ्या जेडीएसने आता राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून कुठलीही तक्रार नाही असे स्पष्ट केले आहे. केवळ गैरसमजातून तक्रार केली होती, असे स्पष्टीकरण जेडीएसने दिले. त्यानंतर चुकीची माहिती मिळाल्यामुळे जनता दलाने तक्रार केली होती, जी आता त्यांनी मागे घेतल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले.
योग्यरित्या निवडणूक लढवूयात- राहुल नार्वेकर
"अर्ज भरु न शकल्याने जनता दलाने तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेतली आणि आमच्याकडे चुकीची माहिती दिली गेली असं कारण दिलं. चार पैकी तीन वॉर्डमध्ये त्यांनी उमेदवार दिले होते. उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती असतानाही त्यांनी तक्रार दिली आणि परत मागे घेतली. यातून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता याच्यामध्ये पडायला नको. लोकांनी नियमाप्रमाणे आपले अर्ज भरले आहेत. त्यानुसार लोक निवडणुका लढतील आणि सगळ्यांनी नियमाप्रमाणे संविधानाचे पालन करत योग्यरित्या निवडणूक लढवूयात आणि निर्णय जनतेवर सोडूयात," असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
आपने तक्रार मागे घेतली नसल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर, "ज्यांना तक्रार करायची आहे ते करु शकतात पण त्यात तथ्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी," असंही राहुल नार्वेकर म्हणाले.