देवेंद्र फडणवीस : त्यागाचे काय होईल?

By यदू जोशी | Published: March 30, 2024 10:58 AM2024-03-30T10:58:13+5:302024-03-30T11:07:13+5:30

सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले.

Devendra Fadnavis: What will happen to Sacrifice? | देवेंद्र फडणवीस : त्यागाचे काय होईल?

देवेंद्र फडणवीस : त्यागाचे काय होईल?

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. रा. स्व. संघाचा स्वयंसेवक, अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, भाजपचा नगरसेवक, महापौर, भाजयुमोचा प्रदेशाध्यक्ष, आमदार, मुख्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री असा वयाच्या ५२ वर्षांपर्यंतचा विलक्षण प्रवास. २०२२ मध्ये राज्यात उद्धव ठाकरे सरकार पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीला शह देत महायुती सत्तेत आली. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत चमत्कार घडवला तो देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने. त्यातून मग सुरत, गुवाहाटीचा प्रवास घडला.

सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले. क्लायमॅक्स बाकी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना फोन केला, ‘मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय तुम्ही नेता म्हणून घेतला आहे पण मी आज तुमचा नेता म्हणून तुम्हाला आदेश देतोय की, तुम्ही मंत्रिमंडळात राहिलेच पाहिजे.’ फडणवीस ‘सागर’ बंगल्यातील एका खोलीत मोदींशी बोलून बाहेर आले अन् त्यांनी काहीच वेळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जुलै २०२३ मध्ये आणखी एक चमत्कार घडला. राष्ट्रवादी फुटली; अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री झाले. लोकसभेचे गणित बसविण्यासाठी दोन मित्र जोडण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करताना फडणवीस यांनी दरवेळी त्याग केला. 

अत्यंत अभ्यासू, प्रचंड आवाका असलेले फडणवीस यांच्यातील चाणाक्ष राजकीय नेत्याचे नवे दर्शन शरद पवार यांच्यासह सर्वांनाच गेल्या काही वर्षांत झाले. पण पक्षासाठी सगळे काही करताना त्यांच्या पदाचा संकोच होत गेला. त्याबाबतच्या अनेक थिअरी अनेकांनी दिल्या. मात्र, त्यासंबंधीची कोणतीही अस्वस्थता कधीही चेहऱ्यावर येऊ न देता ते काम करत राहिले. स्वत:विषयी ते अबोल आहेत. त्यांच्या मनातील खंत, व्यथा, दु:ख कधीही बाहेर येत नाही; अगदी जवळच्यांपाशीसुद्धा. ते चालत राहतात, कामे करत राहतात, अभ्यास करत राहतात आणि अविचल पक्षनिष्ठेच्या मार्गावर पुढे जात राहतात.

या हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला समजू द्यायची नसते म्हणतात. फडणवीस त्यांच्या पुढे आहेत. ज्या हाताने लोकांना मदत केली त्या हातालाही ते कळू देत नाहीत. छटाकभर मदतीचा बभ्रा करणारे अनेक नेते आहेत. पण फडणवीस विरळेच. श्रेयवादाच्या लढाईतही ते पडत नाहीत. स्वत:चे नेतृत्व जातीपातींच्या संदर्भांपलीकडे त्यांनी कधीच नेऊन ठेवले आहे. २०१४ पासूनचे महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांभोवती फिरत आहे. ‘यू कॅन लव्ह हिम ऑर यू कॅन हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम...’ फडणवीसांबाबत हे वाक्य चपखल बसते. पक्षात काही नेत्यांविषयी त्यांचा दुरावा निर्माण झाला; ते बहुभानी फडणवीसांना टाळता आले असते, असे बरेचदा वाटते. 

फडणवीस दोन मित्रांना सोबत घेऊन लोकसभेच्या लढाईवर निघाले आहेत. ज्या विदर्भातून येतात, त्याचा अनुशेष आजही बाकी आहे. सत्तेच्या समीकरणात फडणवीसांचा पदाचा अनुशेष वाढत चालला आहे. त्यागाचा सव्याज परतावा त्यांना मिळावा, ही भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती त्यांचे श्रेष्ठी पूर्ण करतील का? या प्रश्नाचे उत्तर काळ देईलच. तोवर फडणवीस यांच्या संयमाचा कस लागेल.

Web Title: Devendra Fadnavis: What will happen to Sacrifice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.