महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य, मुख्यमंत्रीपदाचा विषय महत्त्वाचा नाही: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 22:05 IST2024-09-04T22:04:42+5:302024-09-04T22:05:06+5:30
Congress Balasaheb Thorat News: चांगले सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आम्ही योग्यवेळी करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य, मुख्यमंत्रीपदाचा विषय महत्त्वाचा नाही: बाळासाहेब थोरात
Congress Balasaheb Thorat News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत नाही. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचे नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे. स्थिर सरकार देणे, हे आमचे उद्दिष्ट्य आहे, असे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
मुख्यमंत्रीपदाचा विषय फार महत्त्वाचा नाही
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपदाचा विषय फार महत्त्वाचा नाही. त्याबाबत आम्ही एकत्र बसवून ठरवू. संविधानविरोधी जे सरकार आहे, कायद्याप्रमाणे न बनलेले, अनेक गोष्टींची चर्चा झाली. खोक्यांची चर्चा झाली, भ्रष्टाचाराची चर्चा झाली, हा प्रकार थांबवणे आणि महायुतीचे सरकार घालवणे हेच प्राधान्य आहे. चांगले सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आम्ही योग्यवेळी करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचे संख्याबळ आल्यानंतरच तिथे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. मविआच्या मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागणीवर बोललोय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असे नाना पटोले म्हणाले.