राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:06 IST2025-01-30T20:05:08+5:302025-01-30T20:06:51+5:30
CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर महायुतीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत.

राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही आक्षेप नोंदवत संशय व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन अनेक दिवस उलटले आहे. नंतर प्रथमच राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांसमोर जाहीरपणे भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी केलेल्या मतप्रदर्शनावरून भाजपासह महायुतीतील नेते राज ठाकरेंवर टीका करत आहेत. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकावर पहिली प्रतिक्रिया दिली.
विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचे समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोक मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात. या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, राज ठाकरे यांच्याबद्दल आपण महाराष्ट्रात बोलू, असे सांगत एका वाक्यात उत्तर दिले. तसेच दिल्ली विधानसभेत परिवर्तन होणार आहे. दिल्लीची जनता भाजपासोबत जाणार आहे. दिल्लीतील परिवर्तन महिला करणार आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार उलथवण्याचा निर्णय दिल्लीकरांनी घेतला आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाची दाखले देत चिरफाड केली. हा निकाल कसा लागला यावर संशय व्यक्त करत लोकसभेनंतर लगेचच तीन चार महिन्यात निकाल फिरतो कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आपल्याला लोकांनी मतदान केले आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, असा दावा करत आता आगामी निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.