“काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:04 IST2026-02-11T15:01:43+5:302026-02-11T15:04:12+5:30
Chandrapur Mayor Election 2026: उद्धव ठाकरे आमच्या भावना समजून घेतील. आम्ही मुंबईत जाऊन त्यांना भेटणार आहोत, असे पदाधिकारी म्हणाले.

“काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले
Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीने महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविले. भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान ३२ मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने दानव यांची निवड झाली. यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
२७ नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. काँग्रेस पक्ष विस्कळीत झालेला आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही सत्ता आणू शकले नाहीत, याची काँग्रेसला लाज वाटायला हवी. चंद्रपूर येथे असे का घडले, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आम्हाला दोष देण्यात अर्थ नाही. तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते. वंचित, एमआयएम यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही, कारण तुमच्यात एकवाक्यता नव्हती. तुमच्या दोन गटात भानगडी सुरू राहिल्या. त्यामुळे इतर पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार होते, त्यांना तटस्थ राहावे लागले आणि वेगळा निर्णय घ्यावा लागला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यानंतर उद्धवसेनेचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी मोठा खुलासा केला आहे.
काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला
आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सोबतच राहण्याचे निर्देश होते. त्यानुसारच आम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी जिथे म्हटले तिथे चर्चेसाठी गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबतच आम्ही चर्चा करत होतो. आम्हाला शिवसेनेची गरज नाही असे त्यांचे मत होते. आमचा वारंवार अपमान केला जात होता, असे संदीप गिर्हे यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला. संजय राऊत यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र इतर नेत्यांच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही निर्णय घेतला. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ते टिकले पाहिजे हीच भावना होती. मला विश्वास आहे की, उद्धव ठाकरे आमच्या या भावना समजून घेतील. स्थायी समितीचे अध्यक्ष पद आम्हाला मिळणार आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत, असेही ते म्हणाले.