‘देश आणि राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला, विजय वडेट्टीवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:55 IST2026-01-13T17:53:14+5:302026-01-13T17:55:43+5:30
Chandrapur Municipal Corporation Election: देश व राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला.यामुळे महागाई व बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

‘देश आणि राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला, विजय वडेट्टीवार यांची टीका
चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी देश व राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला.यामुळे महागाई व बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सभेला संबोधित करताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक शब्दांत भाजपचा समाचार घेतला. देश व राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला.यामुळे महागाई व बेरोजगारी वाढली. गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. हे सत्तेतील भाजपचे पदाधिकारी आता शासन नियमावलींना पायदळी तुडवत असून याचा प्रत्यय भाजपचा माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी शहरातील गोरगरीब जनतेच्या भावनेशी खेळ करून बोगस पट्टे वाटप केल्याच्या प्रकारातून पुढे आला. मागील दहा-दहा वर्षे सत्तेत असूनही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अमृत योजना, हर घर नल योजना, स्वच्छ भारत – सगळ्या केवळ जाहिरातीपुरत्या राहिल्या. नळात पाणी नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत आणि कर मात्र वाढवले जात आहेत. हा अन्याय आता चंद्रपूरची जनता खपवून घेणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही मात्र भ्रष्टाचार मात्र सर्वत्र आहे. भाजपने चंद्रपूरला विकास नव्हे तर दुर्दैव दिले आहे.म्हणून आपण या भाजपला धडा शिकवून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या महिला-विरोधी धोरण, महिला अत्याचार, व देशात लोकशाहीची होणारी गळचेपी या मुद्द्यांवरून भाजपाला घेरले. माजी मंत्री वसंत पुरके यांनी भाजपच्या फसव्या आश्वासनांचा पर्दाफाश करत निवडणूक आली की मोठमोठी स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर जनतेकडे पाठ फिरवायची—हा भाजपचा जुना खेळ आहे. चंद्रपूरला आता लुटारू नव्हे, तर जनतेचे सेवक हवेत, असे आवाहनही धानोरकर यांनी केले.