'महाराष्ट्रात 2200 कारखाने बंद, बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:58 IST2019-10-17T16:56:35+5:302019-10-17T16:58:39+5:30
सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे.

'महाराष्ट्रात 2200 कारखाने बंद, बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली'
नांदेड जिल्ह्यातील बारड येथे भोकर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेला संबोधित करताना, ज्योतिरादित्य यांनी मराठीतून सुरुवात केली. मराठीतून सुरुवात केल्यानंतर माझे आणि तुमचे, माझे आणि महाराष्ट्राचे कौटुंबिक संबंध आहेत. देशातील काही मातींशी माझा संबंध असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीशी माझा संबंध असल्याचे शिंदेंनी म्हटले.
ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी बारड येथील सभेत अशोक चव्हाण यांचे कौतुक करत ते जनसेवक असल्याचे म्हटले. राजकारणापेक्षा जनसेवेला चव्हाण कुटुंबीयांना प्राधान्य दिलंय. आज मी ज्या माणसाच्या प्रचारासाठी आलोय, त्यांचं मन आणि बुद्धी दोन्हीही दुधाप्रमाणे पांढरंशुभ्र असल्याचं शिंदेंनी म्हटलं. भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. तर, पाण्याच्या नावावरुनही राजकारण करण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षात औद्योगिकरणाचा दर 50 टक्क्यांनी घसरला असून 2 हजार दोनशे कारखाने, पुण्यापासून मुंबईपर्यंत, मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत बंद झाले आहेत, या कारखान्यांना टाळे लागल्याचं ज्योतिर्रादित्य शिंदेंनी सांगिलंय.
सध्या कमाई कुणाची होतंय? कामगार, मजूर, शेतकरी देशोधडीला लागला असून सरकमधील मंत्रीगणांचा विकास होत आहे. भाजपा सरकारमुळे साक्षर तरुणाचे पदवीचे प्रमाणपत्र हे बेरोजगारीच्या प्रमाणपत्रात बदलले आहे, असा आरोप शिंदेंनी केला. बेरोजगारी 250 टक्क्यांनी वाढली असून शिपायाच्या नोकरीसाठी पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना अर्ज करावा लागत असल्याचं शिंदेंनी म्हटलं.
दरम्यान, घासल्याशिवाय धार नाही तलावारीच्या पातीला आणि अशोक चव्हाणांशिवाय पर्याय नाही बारडच्या मातीला, अशी एका वाक्यातील घोषणा देऊन ज्योतिर्रादित्य शिंदेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.