Ichalkaranji Mayor: महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरसाठी अनिल डाळ्या; आज अधिकृत घोषणा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:51 IST2026-02-06T11:48:38+5:302026-02-06T11:51:17+5:30
अंतिम घडामोडी निर्णायक

Ichalkaranji Mayor: महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरसाठी अनिल डाळ्या; आज अधिकृत घोषणा होणार
इचलकरंजी : येथील महानगरपालिकेचा पहिला महापौर व उपमहापौर निवडीसंदर्भात गुरूवारी दिवसभर प्रमुख नेतेमंडळींच्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यातून महापौर पदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौर म्हणून अनिल डाळ्या यांची नावे आघाडीवर आली आहेत. आज, शुक्रवारी सकाळी अधिकृत घोषणा झाल्यानंतर अर्ज दाखल करून शनिवारी संध्याकाळी सर्व नगरसेवकांना एका थंड हवेच्या ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
इचलकरंजीचा पहिला महापौर म्हणून आपलेच नाव इतिहासात नोंदवले जावे, यासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात होती. त्यामध्ये आवाडे आणि हाळवणकर गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू होती. आपल्याला मानणारा नगरसेवकच महापौर असावा, असे दोन्ही गटाचे मत होते. त्यावर बैठक झाली. बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात सहा-सात जणांच्या नावांवर सुरू झालेली चर्चा अखेर दोन नावांवर पोहोचली. त्यामध्ये आवाडे गटाकडून धातुंडे, तर हाळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे या दोघांची नावे अंतिम चर्चेसाठी पुढे आली होती.
गुरूवारी उपमहापौर आणि अन्य समित्यांच्या सभापतींबाबत चर्चा करून अखेरीस महापौर पदाचे नाव निश्चित करण्याचे बुधवारी (दि. ४) झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारीही दिवसभर अनेक खलबते झाली. त्यामध्ये आवाडे गटाचे धातुंडे यांचे नाव महापौरसाठी पुढे आले, तर हाळवणकर गटाला उपमहापौरपद देण्याचे ठरवले. त्यानुसार धातुंडे आणि डाळ्या यांचे नाव आघाडीवर आले आहे. शुक्रवारी अधिकृत घोषणा झाल्यानंतर दोघांचेही अर्ज भरले जाणार आहेत.
त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी भाजप व महायुतीच्या नगरसेवकांना एका थंड हवेच्या ठिकाणी हलवले जाणार आहे. तेथून सोमवारी सर्वांना थेट सभागृहात आणून महापौर-उपमहापौर निवडीसाठीचे नियोजन लावले जाणार असल्याचेही समजते.
अंतिम घडामोडी निर्णायक
गुरूवारी दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सायंकाळपर्यंत धातुंडे आणि डाळ्या यांचे नाव महापौर-उपमहापौर पदासाठी पुढे आले आहे. त्यामध्ये रात्रीतून घडणाऱ्या अंतिम घडामोडी निर्णायक ठरणार आहेत. ऐनवेळी एखादे नाव बदलले जाण्याच्या चर्चेने रात्री उशिरापर्यंत जोर धरला होता. शुक्रवारी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.