इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:31 IST2026-02-10T16:30:14+5:302026-02-10T16:31:28+5:30
ऐतिहासिक निवडीला बिनविरोधचे कोंदण

इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड
इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंदा धातुंडे यांची, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल देवकरण डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पदे बिनविरोध निवड करीत इतिहास नोंदविण्यात आला. निवड बिनविरोध करण्यासाठी शिव-शाहू विकास आघाडीने आपली उमेदवारी मागे घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
६५ नगरसेवकांच्या महानगरपालिका सभागृहामध्ये भाजप महायुतीकडे ४७ मतांचा आकडा होता, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडे १७ व उद्धव सेनेचा १ नगरसेवक होता. त्यामुळे दोन्ही पदे भाजपला मिळणार, हे निर्विवाद सत्य असले तरीही निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांकडे विनंती केली होती. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापुरात वास्तव्यास असलेले महायुतीचे सर्व नगरसेवक-नगरसेविका सोमवारी सकाळी इचलकरंजीत आले. अटल बिहारी वाजपेयी चौकापासून थेट चालत त्यांनी सभागृहात प्रवेश केला. पिठासन अधिकारी संजय शिंदे यांनी सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजास सुरूवात केली.
महापौरसाठी उमेदवारी अर्ज भरलेले शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक सयाजी चव्हाण यांनी महापौरच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या सभेला हरकत घेतली. ७ दिवसांची वेळ देण्याऐवजी २ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. ही वेळ अपुरी आहे. त्यामुळे महापौर निवडीला स्थगिती द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, ही मागणी पिठासन अधिकाºयांनी फेटाळून लावली व सभेच्या कामकाजाला सुरूवात केली.
उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली होती. निवडणुकीवर आक्षेप घेणारे चव्हाण यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. धातुंडे यांचा एकच अर्ज राहिल्याने पिठासन अधिकारी शिंदे यांनी धातुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. उपमहापौरसाठी भाजपचे डाळ्या व शिव-शाहू विकास आघाडीच्या संगीता आलासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आलासे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर डाळ्या यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.
महानगरपालिकेच्या इतिहासात दोन्ही पदे बिनविरोध करण्यामध्ये सत्ताधाºयांनी यश मिळवले. निवडीनंतर आयुक्त पल्लवी पाटील व पिठासन अधिकाºयांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना धातुंडे म्हणाले, मी माझ्या महायुतीचे ४७ नगरसेवक मानत नाही, तर सर्वच आपले ६५ नगरसेवक आहेत, असे मानतो. नशिबाने व आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे पद मिळाले आहे. आपण हातात हात घालून काम करूया व शहरातील प्रश्न सोडवूया. पाण्यामध्ये राजकारण न करता कोणत्याही परिस्थितीत पाणी येईल, यासाठी प्रयत्न करूया.
डाळ्या म्हणाले, पक्षाने मला संधी दिली आहे. आपण सर्वांनी एकदिलाने इचलकरंजी शहराच्या विकासासाठी काम करूया. रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, मदन कारंडे, तानाजी पोवार अलका स्वामी, रणजित जाधव, ध्रुवती दळवाई, क्रांती आवळे, मनीषा नवनाळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. महायुतीचे नगरसेवक भगवे फेटे बांधून, तर शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक भगव्या टोप्या घालून सभागृहात आले होते. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. तसेच शहरातून मिरवणूक काढली.
नूतन सभागृहाचे उद्घाटन
महापौर निवडीच्या प्रारंभी मंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिला व फित कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आदींनी उपस्थिती लावली.
सत्ता कोणाची लवकर कळणार नाही
महापौर निवडीनंतर शिव-शाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील हे मनोगत व्यक्त करताना सभागृहातील गटनेते विठ्ठल चोपडे, रवींद्र माने व मी माजी आमदार अशोकराव जांभळे व कारंडे यांच्या तालमीत तयार झालो आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आहे, हे लगेच कळणार नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
सगळ्या मांडवाखालून जाऊ दे
महापौरांनी एक मिनिटसुद्धा वेळ घालवू नये. वरिष्ठ नगरसेवकांचा मान-सन्मान ठेवावा. कामाची माणसे आम्हीच आहोत. वेळ न दवडता लवकर सभा बोलवावी व सगळ्यांना मांडवाखालून घालवावे, असे रवी रजपुते यांनी कोपरखळी मारल्यानंतर सभागृहात हशा पिकला.