Kolhapur: तलावाचा भराव गेला वाहून, २५ एकर भातशेतीचे नुकसान; शेतकऱ्यांतून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:19 IST2025-07-17T12:19:05+5:302025-07-17T12:19:25+5:30
दहा वर्षे झाली तरी काम अपूर्णच

Kolhapur: तलावाचा भराव गेला वाहून, २५ एकर भातशेतीचे नुकसान; शेतकऱ्यांतून संताप
मलकापूर (जि. कोल्हापूर) : शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे (गुरववाडी) येथे जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे तलावाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना बुधवारी पावसामुळे भराव वाहून गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील अंदाजे २५ एकर भातशेतीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून या तलावाचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र, कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. डोंगर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात माती तलावाच्या भरावावर जमा झाली. त्याचवेळी तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बसवलेली लोखंडी पाइपलाइन बंद झाल्याने माती व पाण्याचा दाब भरावावर वाढला व भराव वाहून गेला.
या घटनेत भातशेतीसह काही ठिकाणी ऊसपीकदेखील मातीखाली गाडले गेले. माहिती मिळताच तहसीलदार गणेश लव्हे, सरपंच बाबूराव कांबळे, कृषी सहायक रसिका कामेरकर, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.