Maharashtra Election 2019 : कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले गैरव्यवहार करून थकले : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:06 IST2019-10-10T15:04:36+5:302019-10-10T15:06:51+5:30
काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असताना वेगवेगळ्या योजनांमध्ये गैरव्यवहार

Maharashtra Election 2019 : कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले गैरव्यवहार करून थकले : उद्धव ठाकरे
जालना : शेतकरी कर्जमुक्त आणि चिंतामुक्त कसा होईल, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. पिकविमा मिळावा म्हणून मोर्चे काढले. त्यामुळे एक हजार कोटी रूपये विमा कंपन्यांना देण्या भाग पाडले. दरम्यान, १५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असताना वेगवेगळ्या योजनांमध्ये गैरव्यवहार करून ते आता थकले असल्याची टिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी घनसावंगी येथील प्रचार सभेत बोलताना केली.
घनसावंगी येथील शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी ठाकरे गुरूवारी घनसावंगी दौऱ्यावर आले होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. केवळ भुलथापा मारणे हा आमचा बाणा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेवून जे स्वराज्य स्थापन केले होते त्या पावलावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. समाजातील वंचित घटकांना त्यांच्या विकास आणि हकांपासून दून कोणी ठेवले हे सर्वांना माहीत आहे. सत्ता येताच १० रूपयात पोटभर जेवण आणि १ रूपयामध्ये आरोग्य तपासणी करणार आहोत.
धनगर समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी एकत्रीत लढा उभारला आहे. त्याला आमची भक्कम साथ असून, धनगरांनी त्यांच्या काठीला तलवारीची धार आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली. हिकमत उढाण हे उभारणार असलेल्या साखर कारखान्यासाठी आपण जातीने लक्ष घालू, असे सांगितले. हा कारखाना परिसरात उभा रहावा, यासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी राज्यमंत्री अर्जून खोतकर, लक्ष्मण वडले, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, शिवाजी चोथे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.