निवेदनं, मागण्या, पत्रव्यवहार... पण रस्ता तसाच ! जबाबदार कोण? : लोकप्रतिनिधींचे मौनव्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:20 IST2025-06-02T17:18:39+5:302025-06-02T17:20:50+5:30

Gondia : बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास

Statements, demands, correspondence... but the road remains the same! Who is responsible? : Vow of silence of public representatives | निवेदनं, मागण्या, पत्रव्यवहार... पण रस्ता तसाच ! जबाबदार कोण? : लोकप्रतिनिधींचे मौनव्रत

Statements, demands, correspondence... but the road remains the same! Who is responsible? : Vow of silence of public representatives

अमरचंद ठवरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव :
बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव हा जवळपास १५ ते २० किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून शेवटची घटका मोजत आहे. तालुक्याला जोडणाऱ्या या मार्गाकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांना या मार्गावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लांब पल्ल्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून अपघातास निमंत्रण देणारा रस्ता असे चित्र स्पष्ट दिसत आहे.


बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव एकमेव लांब पल्ल्याचा तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो या मार्गावरून बोरी, मांडोखाल, महागाव, शिरोली, माहूरकुडा, मालकनपूर, निलज, मोरगाव इत्यादी गावातील गावकरी नित्यनेम ये-जा करीत असतात. खासगी वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाची बससेवा या मार्गावरून अविरतपणे सुरू असते. या मार्गाची देखभाल दुरुस्ती कुणाकडे आहे हेच कळायला मार्ग नाही. १५ ते २० किलोमीटर मार्गाचा लांब पल्ल्याचा रस्ता सर्वत्र उखडून गेला आहे. संबंधित विभागानेसुद्धा डोळेझाक केल्याचा आरोप परिसरातील गावकरी करीत आहेत. दररोज १५ ते २० गावचे ग्रामस्थ याच मार्गावरून मार्गक्रमण करून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्या कामकाजाचा निपटारा करीत असतात. उच्च शिक्षणासाठी खड्डेमय प्रवास करून विद्यार्थ्यांना अर्जुनीच्या विद्या मंदिराचे दर्शन घडते हे विशेष. गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याची दयनीय अवस्था असून संबंधित लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत अशी प्रतिक्रिया मोरगाव निलज येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाहनांची सतत वर्दळ असल्याने या रस्त्यावर मधोमध मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसून येतात. यामुळे तारेवरची कसरत करून मार्गक्रमण करावे लागते.


या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास जीवावर बेतणारा
बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून यावरून सततची वाहतूक सुरू असते. मात्र उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते अशी स्थिती आहे. त्यातही रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे जीवावर बेतण्याचा प्रकार आहे. खड्ड्यामुळे कथी अपघात घडणार सांगता येत नाही.


रस्ता दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष
ग्रामीण भागातील जनतेची गरज लक्षात घेऊन माहूरकुडा प्रभागाच्या जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रस्ता दुरुस्तीसाठी त्यांनी निवेदन दिले. परंतु संबंधितांनी त्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. परिणामी बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव रस्ता शेवटची घटका मोजत आहे.


"रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील काही वर्षांपासून संबंधितांना पाठपुरावा केला. या मार्गावरून प्रवास करणे तारेवरची कसरत ठरत आहे. संबंधित गावकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी संबंधितांना पत्रव्यवहार केला, परंतु आजपावेतो कोणतीच दखल घेतली गेली नाही."
- कविता कापगते, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया

Web Title: Statements, demands, correspondence... but the road remains the same! Who is responsible? : Vow of silence of public representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.