कुटुंबातील एकालाच मिळणार 'पीएम किसान' योजनेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:50 IST2025-01-15T15:49:16+5:302025-01-15T15:50:34+5:30
लाभार्थ्यांची संख्या होणार कमी : केंद्र सरकारचा निर्णय

Only one person in a family will get the benefit of 'PM Kisan' scheme
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्कवगळता ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे. त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर, इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत, त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८मध्ये करण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात दीड लाखांच्यावर शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे. ज्यावेळी ही योजना सुरू झाली, त्यावेळी एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला.
पीएम किसानचे पैसे कधी येणार ?
पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. १९व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी करू शकते. मात्र, सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
वारंवार केवायसी कशासाठी
शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात. त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचीच ती कागदपत्रे असूनही वारंवार ई- केवायसी करायला का सांगितली जाते, हा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.