वीज ग्राहकांनो फसव्या संदेशापासून अलर्ट राहा; अन्यथा होऊ शकते तुमचे बँक खाते साफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:35 IST2025-01-29T15:25:24+5:302025-01-29T15:35:53+5:30
Gondia : अनेक ग्राहकांना येतोय मेसेज

Electricity consumers, be alert against fraudulent messages; otherwise your bank account may be wiped out
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अनोळखी क्रमांकावरून वीज बिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या अॅपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याची माहिती दिली आहे.
तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. एखाद्या ग्राहकाने संपर्क साधला तर वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते.
त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. अशाप्रकारच्या घटना जिल्ह्यात यापूर्वी कित्येकांसोबत घडलेल्या आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. तसेच वीज ग्राहकांनी कुठल्याही संदेशावर विश्वास ठेवू नये व सावध राहण्याचा सल्ला महावितरणने दिला आहे.
अधिकृत केंद्रावरूनच येतात मेसेज
महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीज बिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीज बिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते.
टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क
तसेच अधिकृत मेसेजमधून वीज ग्राहकांना किंवा नागरिकांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. यामुळे कुणालाही वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा वीज वितरण कंपनीच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.