अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचं हे विमान २४२ प्रवाशांसह लंडनमध्ये उड्डाण करायला सज्ज होतं. परंतु काहीच सेकंदात नजीकच्या हॉस्टेलमध्ये हे विमान आदळलं आणि मोठा स्फोट झाला. यामुळे विमानातील अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच या अपघातानंतर बिग बॉस मराठी ५ मध्ये झळकलेली कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने एअर इंडियावर राग व्यक्त केलाय.
अंकिताची विमान अपघातानंतरची पोस्ट व्हायरल
अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने एअर इंडियाच्या वाईट व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. अंकिता लिहिते, "मी अलीकडेच एअर इंडियामधून ट्रॅव्हल केला. AC व्यवस्थित चालत नव्हता. स्क्रीन्सची अवस्थाही वाईट होती आणि खाण्याबद्दल तर काही बोलून नका. ९ तासांचा प्रवास आणि ही अवस्था. या वाईट अवस्थेमध्ये ते लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?". पुढे अंकिताने खाण्याचा फोटो पोस्ट करुन वस्तुस्थिती दाखवली. अंकिताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून लोकांनी तिला समर्थन दिलंय.
एअर इंडियाचं विमान कोसळलं
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिली आहे. विमानामध्ये एकूण २४२ जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटीश नागरिक बचावला आहे. देसाई यांनी सांगितलेला आकडा हा विमानातील प्रवाशांपेक्षाही खूप जास्त आहे. यामुळे यात बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.