‘भूतकाळात नव्हे, वर्तमानकाळात जगतो’
By Admin | Updated: May 6, 2017 05:28 IST2017-05-06T05:04:37+5:302017-05-06T05:28:06+5:30
बॉलिवूड करिअरमध्ये आतापर्यंतच्या प्रवासात साकारलेल्या भूमिकांचा पश्चात्ताप होत नसून, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले आहे

‘भूतकाळात नव्हे, वर्तमानकाळात जगतो’
- Janhavi Samant -
बॉलिवूड करिअरमध्ये आतापर्यंतच्या प्रवासात साकारलेल्या भूमिकांचा पश्चात्ताप होत नसून, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले आहे. कारण मी भूतकाळात नव्हे तर वर्तमानकाळात जगतो, अशी बोलकी प्रतिक्रिया अभिनेता अर्जुन कपूर याने दिली. त्याच्या आगामी चित्रपटाविषयी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आतापर्यंतच्या वाटचालीविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. शिवाय वर्तमानकाळ अन् भविष्यात करिअर घडविताना कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यावेसे वाटेल, याचा खुलासा केला. ‘सीएनएक्स मस्ती’च्या संपादक जान्हवी सामंत यांनी त्याच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : तुझ्या आगामी चित्रपटाचा विषय हा पूर्णत: नवा आणि वेगळा आहे, याविषयी काय सांगशील?
- आगामी चित्रपटाचा विषय हा आधुनिक नात्यांच्या गुंतागुंतीचा अन् अधुरेपणाचा आहे. तारुण्यात असताना बऱ्याचवेळा असे प्रसंग येतात, की तुम्हाला आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात. शिवाय तुम्हाला नव्याने तयार झालेल्या नात्यालाही न्याय द्यायचा असतो. त्यावेळी भावनांची प्रचंड गुंतागुंत होते. नात्यांचा हा सफर मग अपूर्णच राहून जातो. हा चित्रपट याच नात्यांच्या अर्धवट प्रवासाभोवती फिरत असतो. तुम्हाला हे नवीन नातं हवं असतं, अन सोडायचंही नसतं. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे प्रसंग येतच असतात. हा विषय पूर्णत: शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचा आहे. चित्रपट बघताना तुम्हाला हे जाणवेल की, मुलाला जे मुलीविषयी वाटते तेच मुलीला मुलांविषयी वाटत असते. बाकी सर्व चित्रपट बघताना
तुम्हाला समजेलच.
प्रश्न : आतापर्यंत केलेल्या चित्रपटांकडे बघताना तुला नेमके कशा प्रकारचे चित्रपट करावेसे वाटतात, झालेल्या चुकांमधून तू काय शिकलास?
- मी भूतकाळात रमणारा माणूस नाही. त्यामुळे मी माझ्या भूतकाळात केलेल्या भूमिका आणि घेतलेल्या निर्णयातूनच मी शिकत आलो आहे. मला माझ्या कुठल्याच निर्णयाचा किंवा भूमिकेचा पश्चात्ताप होत नाही. कारण त्या गोष्टी घडल्या नसत्या तर मी आज येथे नसतो. मला विशिष्ट प्रकारच्याच भूमिका मिळाव्यात, असा मी कधी विचार केला नाही. त्यामुळे माझ्यासमोर जे काही आव्हान असेल त्याकरिता मी तयार आहे. कारण प्रत्येक निर्णयातून शिकण्याची माझी तयारी आहे. प्रेक्षकांना आमच्या मर्यादा माहीत नसतात. कारण दिग्दर्शक जे सांगेल तसेच आम्हाला करावे लागते. दिग्दर्शकांच्या अपेक्षांसमोर आमच्या इच्छा शून्य असतात. प्रत्येक संधीमध्ये कठोर परिश्रम करणे, हे आपल्या हातात असते. माझा मुख्य उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करणे असते. सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या इच्छा पूर्ण करीत नाहीत, हे ही तेवढेच खरे आहे.
प्रश्न : विनोदी भूमिकांविषयी तुझे काय मत आहे?
- मी विनोदी भूमिका करतोय. आगामी ‘मुबारकाँ’मध्ये मी विनोदी भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मी दुहेरी भूमिकेत आहे. अनिल बज्मी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मी सरदारच्या भूमिकेत असून त्यात कॉमेडीचा चांगला तडका लावला आहे. हा चित्रपट जुलैमध्ये रिलीज होणार आहे. वास्तविक मला नेहमीच विनोदी भूमिका करायला आवडतात. ‘की अँड का’ आणि ‘मुबारकाँ’ या दोन चित्रपटांची तुलना केल्यास दोन्ही वेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत. कारण एक भारतीय समाजव्यवस्थेशी निगडित आहे, तर दुसरा पूर्णपणे विनोदी आणि फॅमिली इंटरटेनर आहे. लोक मला आॅफस्क्रीनसुद्धा विनोदीच म्हणत असतात.
प्रश्न : ‘की अँड का’ किंवा तुझ्या आगामी चित्रपटात तुझ्यासोबतच्या नायिका नेहमीच्या हिंदी चित्रपटांपेक्षा वेगळ्या दाखविल्या आहेत. त्याविषयी तरुण प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
- तरुण प्रेक्षकांमध्ये याविषयीच्या प्रतिक्रिया निश्चितच उत्साही आहेत. सध्याच्या काळात महिला करिअरविषयी जागरूक आहेत आणि माझ्या चित्रपटात अशाच महिला नायिका म्हणून असतात. त्यामुळे माझी याविषयी नेहमीच प्रशंसा केली जाते. ‘की अँड का’ या चित्रपटातून अनेक महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली, याचे मला समाधान वाटते.
प्रश्न : तरुण पिढीला रिलेशनशिपविषयी तू काय सल्ला देशील?
- नातेसंबंध हे नेहमीच गुंतागुंतीचे असतात. आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला लहानाचे मोठे करताना आपल्यावर काही संस्कार केले आहेत. मला असे वाटते की, ‘नव्या पिढीने रिलेशनशिपविषयी लग्नापर्यंतचा विचार केला असेल तर त्यांनीही मागील पिढीकडून आलेले संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवेत.’
प्रश्न : तुझा फिटनेस फंडा काय?
- याविषयी मी अधिक जागरूक असतो, असे म्हणायला मला आवडेल. कारण जिमला जाणे हा माझा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. तुमचे शरीर क्रियाशील असेल तर तुमचा मेंदू क्रियाशील राहील. तुम्ही वजन कमी करत असाल तर वजन कमी करण्यापुरताच व्यायाम न ठेवता, तो तुमच्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. त्यातून होणारे फायदे बरेच आहेत.