आयुष्यातील अंतर्द्वंद्व मांडणारा वजीर
By Admin | Updated: January 7, 2016 01:57 IST2016-01-07T01:57:47+5:302016-01-07T01:57:47+5:30
निर्माता विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोडक्शन कंपनीचा चित्रपट ‘वजीर’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक बिजॉय नांबियार यांनी केले आहे

आयुष्यातील अंतर्द्वंद्व मांडणारा वजीर
निर्माता विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोडक्शन कंपनीचा चित्रपट ‘वजीर’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक बिजॉय नांबियार यांनी केले आहे. बिजॉय यांनी यापूर्वी हिंदीत डेव्हिड आणि शैतान या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. वजीरच्या प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन, फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरी हे आहेत. ‘लोकमत’ समूह या चित्रपटाचा मीडिया पार्टनर आहे. सोमवारी वजीरची जोडी फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरी यांनी लोकमतच्या मुंबई कार्यालयात संपादकीय टीमसोबत चित्रपटाशी संबंधित व अन्य अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा केली...
प्रश्न : या चित्रपटाचे शीर्षक वजीर आहे आणि प्रमोशनमध्ये बुद्धिबळाच्या खेळाला प्रमुख स्थान देण्यात आले आहे. आपण खासगी जीवनात बुद्धिबळ खेळता?
फरहान : लहानपणी आमच्या घरात एका खोलीत बुद्धिबळाचा खेळ ठेवलेला असायचा. संधी मिळेल तेव्हा मी बुद्धिबळाच्या सोंगट्यांशी खेळत होतो. खरं सांगायचं तर हा खेळ तेव्हा कळतच नव्हता. मोठा झाल्यावर मित्रांसोबत जेव्हा बाहेर जायचो तेव्हा आवर्जून हा खेळ खेळायचो. मला आजही आठवते, एकदा गोव्यात गेलो असताना तेथे मित्रांसोबत बीचवर हा खेळ खेळायला तेव्हा खूप आवडायचे. आमचे एक मित्र होते. त्यांचे नाव सांगणार नाही, पण ते कमालीचे खेळायचे. त्यांनी अनेकदा मला या खेळातील बारकावे सांगितले. माझी एक सुप्त इच्छा असायची की, मी एकदा तरी त्यांना बुद्धिबळात हरवेन आणि खरोखरच एक दिवस मी त्यांना या खेळात हरविले. तो दिवस माझ्यासाठी खास होता.
प्रश्न : चित्रपटाच्या कथेसोबत बुद्धिबळाचे नेमके काय नाते आहे? हा खेळ चित्रपटाचा प्रमुख भाग आहे?
फरहान : चित्रपटाची कथा तशी वेगळी आहे. पण हा खेळ चित्रपटाचा एक भाग आहे. कथानकाबाबत जास्त बोलणे योग्य ठरणार नाही. पण एवढे सांगू शकतो की, ही दोन वेगवेगळ्या विचारांच्या मित्रांची, मैत्रीची कथा आहे. मैत्री कशी झाली? का झाली? आणि यामुळे काय झाले? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. यात सस्पेन्स, थ्रिलर आहे.
प्रश्न : असे समजले आहे की, आपण चित्रपटात एनएसजी कमांडोची भूमिका करत आहात? काय हे खरे आहे?
फरहान : हो, बरोबर आहे. पण हेही सांगू इच्छितो की, हा चित्रपट एनएसजी कमांडोंच्या अॅक्शनवर आधारित नाहीये. हा चित्रपट या कमांडोच्या खासगी आयुष्यावर भाष्य करतो.
कशा प्रकारे त्याच्या आयुष्यात दु:ख आहे.
त्याचा संपर्क अशा एका व्यक्तीशी होतो जो
स्वत:च एका दु:खाचा प्रवास करत आहे. हे
दोघे कशा रीतीने एकमेकांशी जोडले जातात
आणि आपले दु:ख वाटून घेतात, यावर चित्रपट आधारित आहे.
प्रश्न : ‘लक्ष्य’ या चित्रपटानंतर ११ वर्षांनंतर आपण अमिताभ यांच्यासोबत काम केले आहे. आपण काय फरक अनुभवत आहात?
फरहान : एवढ्या वर्षांनंतर त्यांच्यासोबत काम करत आहे. तरीही त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही, असे मला वाटते. अमिताभजी आजही तसेच आहेत जसे ते त्या वेळी होते. अभिनयाचा तोच जोश, एकाग्रता आणि तोच करारीपणा आहे. यातून आम्हाला खूप काही शिकण्यासारखे मिळते. आमच्या पिढीतील प्रत्येक कलाकार अमिताभजींसोबत काम करायला मिळाल्यामुळे स्वत:ला नशीबवान समजतो. ज्यांना आतापर्यंत ही संधी नाही मिळाली त्यांच्यासाठी अमिताभजींसोबत काम करणे हेच मोठे स्वप्न असते. मी नशीबवान आहे की मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
प्रश्न : चित्रपटात आपण अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गाणे गायले आहे. त्याबाबत काही...
फरहान : खूप मजा आली. चित्रपटात तशी अनेक प्रकारची गाणी आहेत. पण हा चित्रपट मैत्रीवर आधारित असल्याने असे वाटले की, मैत्रीवर एखादे गाणे असावे आणि हे गाणे तयार झाले. अमिताभ किती चांगल्या प्रकारे गातात हे सर्वांनाच माहीत आहे. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.
प्रश्न : आपण जी भूमिका केली त्यासाठी काही विशेष तयारी?
फरहान : खूप काही नाही. मुंबई पोलीसमधील माझे काही मित्र आहेत. आवश्यकतेनुसार त्यांच्याशी चर्चा करायचो. कारण, ते पात्र अधिक उठावदारपणे करता यावे, हा त्यामागचा उद्देश होता.
प्रश्न : बिजॉय नांबियार यांच्या दिग्दर्शनात काम करण्याचा अनुभव कसा होता?
फरहान : ते प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यामुळे आपले काम उत्तमपणे कसे होईल याची ते काळजी घेतात. अभिनय चांगला झाला तर दाद देतात, पण त्यांना चांगला वाटला नाही तर तसे स्पष्टपणे सांगतात. कलाकाराला पूर्ण स्वातंत्र्य देतात.
प्रश्न : कलाकार म्हणून या चित्रपटाबाबत किती समाधानी आहात?
फरहान : अशा चित्रपटात काम करायला मिळाले याचे खूप समाधान आहे. प्रेक्षकांना एक चांंगला चित्रपट पाहायला मिळेल असा विश्वास आहे.
प्रश्न : आपण एक अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहात. वजीरच्या सेटवर आपण नेमक्या कोणत्या भूमिकेत होतात?
फरहान : वजीरच्या सेटवर मी फक्त कलाकार होतो आणि त्या चौकटीतच काम केले. अर्थात चित्रपट निर्मिती हे टीमवर्क असते. जर काही सूचना असेल तर अवश्य दिली जाते.
प्रश्न : फरहान यांची नायिका म्हणून आपला हा पहिलाच चित्रपट आहे. जेव्हा या चित्रपटाची आॅफर मिळाली तेव्हा आपली प्रतिक्रिया काय होती?
अदिती : मी स्वत:ला नशीबवान समजत होते आणि थोडीशी गोंधळलेलीही होते. एक असा चित्रपट जो की विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये तयार होत आहे. अमिताभ बच्चन आणि फरहान यांच्यासारखे कलाकार काम करत आहेत तेव्हा अशा चित्रपटात काम करण्यासाठी जास्त विचार करण्याची गरजच पडत नाही. एक कलाकार म्हणून सांंगते की, या चित्रपटात मी जी भूमिका केली आहे अशी भूमिका यापूर्वी कधीच केली नाही. लोकांना चित्रपट नक्की आवडेल, असा विश्वास वाटतो.
कौटुंबिक परंपरेचा दबाव नाही
फरहान अख्तर यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून चित्रपट क्षेत्राशी जोडले गेलेले आहे. अशा कुटुंबातील मुलांना शक्यतो परंपरेनुसार काम करण्याचा दबाव असतो. पण फरहान असे काही मानत नाहीत. ते म्हणतात, माझ्यावर असा काही दबाव नाही. उलट आमच्या कुटुंबात तर नेहमीच वेगळे काही करण्याचा पायंडा आहे. पप्पा (जावेद अख्तर) यांनी नेहमी लेखनच केले. पण मी दिग्दर्शन क्षेत्रात आलो. जेव्हा मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा पप्पांनी हसत हसत म्हटले होते की, आपल्या आवडीचे काम करशील तर यश नक्की मिळेल.
फरहान यांनी ‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून दिग्दर्शनाची कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर त्यांनी ‘लक्ष्य’, ‘डॉन’ आणि ‘डॉन २’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘रॉक आॅन’च्या माध्यमातून ते प्रथमच पडद्यावर आले. त्यानंतर ते दिग्दर्शक म्हणून पुन्हा परतले नव्हते. शाहरूखसोबत ‘डॉन ३’च्या चर्चा होत आहेत. पुन्हा दिग्दर्शनात येण्याबाबत फरहान यांचे म्हणणे आहे की, मी दिग्दर्शनात परतणार आहे हे नक्की, पण केव्हा हे सांगता येणार नाही. २०१० पासून कलाकार म्हणून इतका व्यस्त आहे की, आतापर्यंत उसंतच मिळाली नाही. भविष्यात गायक म्हणूनही ते नवा अल्बम घेऊन येऊ इच्छितात.
चित्रपटाने दोनशे ते तीनशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला तर तो यशस्वी झाला असे समजले जाते. याबाबत बोलताना फरहान म्हणतात, सर्जनशीलता आणि व्यवसाय या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. अनेकदा चित्रपट चांगला व्यवसाय करत नाहीत, पण त्यातील सर्जनशीलता कायम आठवणीत राहते. ही व्यावसायिक फिल्म इंडस्ट्री आहे. येथे खूप पैसा लागतो. त्यामुळे कमाईच्या आकड्यांनाही वेगळे महत्त्व आहे. या दोन्हीत संतुलन असण्याची गरज आहे.