‘ख्वाडा’साठी कलाकारांनी घेतले नाही मानधन
By Admin | Published: December 13, 2015 12:38 AM2015-12-13T00:38:02+5:302015-12-13T00:38:02+5:30
कोणत्याही चित्रपटासाठी, कलाकृतीसाठी काय महत्त्वाचं असतं? कलाकार, तंत्रज्ञान, दिग्दर्शक, जागांच्या परवानग्या, सर्वांचा वेळ... आणि पैसा. पैसे हा चित्रपटातील इतका
कोणत्याही चित्रपटासाठी, कलाकृतीसाठी काय महत्त्वाचं असतं? कलाकार, तंत्रज्ञान, दिग्दर्शक, जागांच्या परवानग्या, सर्वांचा वेळ... आणि पैसा. पैसे हा चित्रपटातील इतका महत्त्वाचा घटक आहे, की त्याशिवाय एक सीनदेखील पूर्ण होऊ शकत नाही. एकीकडे बॉक्स आॅफिसवर चित्रपट करोडोंचा गल्ला जमवत आहे, अर्थातच ही कौतुकाचीच गोष्ट आहे. पण दुसरीकडे एका चित्रपटातील...
राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटातील कलाकारांनी कसलेही मानधन न घेता चोख अभिनय बजावला आहे. बसतोय विश्वास? नाही ना... पण हे शक्य करून दाखवलं आहे ‘ख्वाडा’ या चित्रपटातील कलाकारांनी...
तेदेखील आजच्या महागाईच्या, केवळ स्वत:चा हेतू साधू इच्छिणाऱ्यांच्या जगात. अहो इतकेच काय, पण या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी स्वत:ची जमीनदेखील विकली. मात्र तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या या रिस्क फॅक्टरवर कधीही कोणतीच शंका न घेता कायमच सपोर्ट केला.
या चित्रपटातील कलाकारांना मानधन देण्यात येणार नाही या तत्त्वावरच सर्व कलाकारांनी काम केले, केवळ तंत्रज्ञांनाच त्यांच्या कामाचे मानधन दिले जात होते. ‘ख्वाडा’ या नावाप्रमाणेच अनेक टक्केटोणपे ओलांडून चित्रपटाने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे सांगतात, ‘गेले 3-4 वर्षे या चित्रपटाचे काम सुरू आहे, त्यासाठी मी माझी जमीन विकली, पण आजवर माझ्या कुटुंबीयांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार, त्या जमिनीचं काय, असे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. कुटुंबीयांइतकाच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा मला खूप चांगला पाठिंबा मिळाला. ६ शेड्यूलमध्ये आम्ही या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. २ दिवस अगोदर सांगितलं तर संपूर्ण टीम शूटिंगला हजर राहायची. त्यामुळे हा चित्रपट केवळ माझा न राहता त्या सगळ्यांचा झाला होता. कारण त्यांचा सर्वांचा हट्ट होता, की काही झाले तरी हा चित्रपट पूर्ण करायचाच.’
चित्रपटाला मिळालेल्या
यशाबद्दल कऱ्हाडे सांगतात, ‘‘काम कठीण होतं, पण मी फक्त प्रयत्न करीत गेलो. हा सगळाच अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. चित्रपटाचे शूटिंग झाल्यावर आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही केवळ पैशांअभावी हा चित्रपट प्रदर्शित करता येईल की नाही ही शंका होती. पण तेव्हा निर्माते शेखर मोरे माझ्या मदतीला धावून आले आणि या सगळ्यांच्या मदतीनेच चित्रपट खऱ्या अर्थाने पूर्ण झाला.’’