डोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:32 PM2021-04-23T13:32:12+5:302021-04-23T13:34:20+5:30
ForestDepartment Environment Sangli : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील रानमाळावर रानमेवा फुलला आहे. निसर्ग हा आपल्या सौंदर्याने पर्यटकांवर नेहमीच भुरळ पाडत असतो. खास करून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरित निसर्ग, येथील म्हणजे रानमाळावर फुलणारा करवंदे, जांभूळ, डोंबले हा रानमेवा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो.परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे या पर्वणी पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
विकास शहा
शिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील रानमाळावर रानमेवा फुलला आहे. निसर्ग हा आपल्या सौंदर्याने पर्यटकांवर नेहमीच भुरळ पाडत असतो. खास करून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरित निसर्ग, येथील म्हणजे रानमाळावर फुलणारा करवंदे, जांभूळ, डोंबले हा रानमेवा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो.परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे या पर्वणी पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
उन्हाळ्यात चांदोली अभयारण्य परिसर, खुंदलापूर , उत्तर भागातील डोंगरी भागात, डोंगरदऱ्यामध्ये , मेणी खोरे आणि गुढे पांचगणी या विभागात मुबलक प्रमाणात मिळणारे करवंद, जांभूळ, इत्यादी रानमेवा म्हणजेच स्थानिक आणि पर्यटकांसाठी जणू मेजवानीच असते. हा डोंगरी भाग असल्याने येथील जंगलात मोठ्या प्रमाणात मिळणारा हा रानमेवा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. येथे आंबट, गोड, करवंद आणि जांभूळ या रानमेवा उन्हाळ्यात उपलब्ध असतो.
मार्च ते जून या महिन्यामध्ये मिळणारा हा रानमेवा म्हणजेच पर्यटकांच्या आवडीचे फळे. काही पर्यटक तर खास डोंगर, जंगलात भटकंती करत याचा आस्वाद घेत असतात. जंगलात किंवा रस्त्याच्या कडेला असणारे तोरणे ही फळे दिसताच येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोह आवरता येत नाही, त्यामुळे पाऊले आपोआपच थांबली जाऊन त्यादिशेने वळतात. जर आणखी एखाद्या वळीव पावसाने हजेरी लावली तर करवंदे वेगाने पिकतील मात्र लॉकडाऊनमुळे याचा आस्वाद मात्र घेता येणार नाही.
खुंदलापूर आदी भागातील धनगर समाजातील महिला व पुरुष उदरनिर्वाहासाठी हा रानमेवा विकण्यासाठी शिराळा, इस्लामपूर, सांगली आदी भागात जातात पण सध्याचे कोरोनाचे वातावरण पाहता सर्वत्र टाळेबंदी असल्याने या रानमेव्यांचा आस्वाद घेणे कठीणच होऊन बसले आहे.तसेच धनगर समाजातील या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.