- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूचा आयकॉन खेळाडू विराट कोहली याने म्हटले की, ‘आमच्या या जेतेपदाचा स्तर कसोटी सामन्यातील विजयाच्या तुलनेत पाचपट कमी आहे.’ विराटचे हे वक्तव्य फार मोठे मानले पाहिजे. युवा खेळाडू आणि क्रिकेट हा केवळ संदेश नव्हे, तर बोध आहे. कोहलीचे सुरुवातीपासूनचे मत असे की, क्रिकेटपटूंना सन्मान मिळवायचा असेल, तर त्यांनी कसोटी खेळायला हवे. खेळाडूचे खरे मूल्यमापन कसोटीतील कामगिरीद्वारा होते.
लीगमध्ये पैसा, पण कला नाही : सध्या टी-२० ची लोकप्रियता शिखरावर आहे. प्रत्येक देशात टी-२० लीग खेळली जाते. अनेक खेळाडू आपल्या देशाकडून खेळण्याच्या तुलनेत फ्रॅन्चायजीसाठी खेळायला लागले. ते कसोटी खेळू इच्छित नाहीत. टी-२० लीगमध्ये पैशाचा पूर वाहतो, पण कलात्मक क्रिकेट खेळले जात नाही.
ब्रॅडमन-तेंडुलकर प्रेरणा : हे चित्र पाहिल्यानंतर विराटचे वक्तव्य खरे ठरते. सन्मान मिळविण्यासाठी कसोटी खेळणे गरजेचे आहे, क्रिकेटचा इतिहासही कोहलीच्या वक्तव्यास दुजोरा देणारा आहे. डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, जॅक हॉब्स, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, इम्रान खान, हनीफ मोहम्मद, रिचर्ड हॅडली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, ज्योफ बायकॉट, जॅक कॅलिस, बेन स्टोक्स या महान खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण कसोटीतील कामगिरीच्या आधारेच झाले. तथापि, त्यांचा खरा सन्मान वाढला तो कसोटी क्रिकेटमुळेच!
बेव्हन महान का नाही?
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेव्हन याला महान खेळाडू संबोधले जाते. तो चांगला फिनिशर होता. त्याची कसोटी कारकीर्द मात्र साधारण राहिली. त्यामुळेच तो सहकारी रिकी पॉंटिंग, शेन वॉर्न, स्टीव्ह वॉ यांच्या पंक्तीत स्थान मिळवू शकला नाही.
कोहलीचे वक्तव्य एक ‘घोषवाक्य’
भारत - इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. याद्वारे डब्ल्यूटीसीचा नवा टप्पाही सुरू होत आहे. या मालिकेत यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, स्वत: कर्णधार शुभमन गिल या युवा खेळाडूंना दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल. विराटने जे म्हटले, ते वाक्यही डोक्यात ठेवायला हवे. मागच्या डब्ल्यूटीसी टप्प्यात पाहण्यात आले की, भारतीय संघाचे कसोटीकडे लक्ष नव्हते. कसोटीला त्यांनी सहज लेखले. परिणाम असा झाला की, भारताला फायनल गाठता आले नव्हते. यामुळे विराटच्या वक्तव्यात ‘दम’ दिसतो. विराटचे वक्तव्य घोषवाक्य बनावे, जेणेकरून प्रत्येक युवा खेळाडूने ते ध्यानात ठेवावे. विराटच्या वक्तव्यात त्याच्या कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याच्या वेदना झळकतात. या वक्तव्याने विराटने स्वत:च्या निवृत्तीबद्दल हळहळही स्पष्ट केली.
कसोटीला का म्हटले जाते ‘कसोटी’
कसोटीत मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी फार वेळ लागतो. संघात स्थान पक्के असेल याची खात्री नसते.
कसोटी क्रिकेट तंत्र, संयम आणि समर्पणवृत्तीची परीक्षा घेते.
कसोटीत आज जी स्थिती असते, ती उद्यासारखी नसते. अशा वेळी खेळाडूने स्वत:ला सकारात्मक ठेवणे महत्त्वपूर्ण ठरते.
कसोटी आयुष्यातील चढउतार शिकवितो. त्यामुळेच या प्रकाराला कसोटी संबोधले जाते. यावर तुम्ही मात केली की, विराटसारखे महान बनू शकता.
कोहलीचे योगदान
१५ वर्षे कसोटी खेळला.
त्याच्या नेतृत्वात भारत ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकला.
कसोटीला नेहमी प्राधान्य देणारा कोहली या प्रकाराला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे.
Web Title: Why is Virat Kohli saying, 'If you want to be great, play Tests!'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.