भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० वर्ल्डकप २०२६च्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला. इशान किशनच्या ७७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला.
भारतीय संघाने ३ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला. आता भारताचा उरलेला एक सामना नेदरलँड्सशी होईल. पण रंजक बाब अशी की, पाकिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य भारताच्या हाती येऊ शकते.
नेदरलँड्स आणि अमेरिका या दोन संघांचा पराभव करून पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती, पण भारताविरूद्ध त्यांचा पराभव झाला. आता त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नामिबियाशी होणार आहे.
पाकिस्तानी संघाशी नामिबियाचा सामना १८ फेब्रुवारीला दुपारी होणार आहे. या सामन्यात जर उलटफेर होऊन नामिबियाने पाकिस्तानले हरवले, तर पाकिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य भारतीय संघ ठरवेल.
झिम्बाब्वेने जसा ऑस्ट्रेलियाचा आश्चर्यकारक पराभव केला, तसेच नामिबियाने पाकिस्तानला हरवल्यास सर्व सामन्यांनंतर नामिबिया २ तर पाकिस्तान ४ गुणांवर राहिल. मग पाकिस्तानला भारतावर अवलंबून राहावे लागेल.
त्याच दिवशी संध्याकाळी असलेल्या भारत-नेदरलँड्स सामन्यात भारताचा संघ काही कारणास्तव हरला, तर नेदरलँड्स ४ गुणांवर पोहोचेल आणि नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तानला बाहेर ढकलून सुपर-८ मध्ये प्रवेश करेल.
म्हणजेच, पाकिस्तानने स्वत:चा सामना न जिंकल्यास त्यांना भारताच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. आणि जर भारताने 'स्मार्ट गेम' केला तर पाकिस्तान स्पर्धेतून बाद होऊन नेदरलँड्स पुढल्या फेरीत दिसू शकेल.