भारतीय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या टीम इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. इंग्लंड दौऱ्यावर बुमराहच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेल. संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी त्याचा फॉर्म आणि फिटनेस खूप महत्त्वाचा आहे.
गेल्या काही वर्षांत बुमराहने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तो दिवसेंदिवस अधिक घातक गोलंदाज बनत आहे. याचदरम्यान, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आपल्या पतीबद्दल एक मोठे विधान केले आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी सुमारे दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये लग्न केले. सप्टेंबर २०२३ मध्ये जसप्रीत बुमराह बाबा झाला. बुमराहच्या मुलाचे नाव अंगद आहे. तो अनेकदा आई संजनासोबत स्टेडियममध्ये दिसतो.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने अलीकडेच तिच्या पतीच्या क्रिकेट कारकिर्दीतील सकारात्मक बदलांबद्दल उघडपणे सांगितले. जसप्रीत बुमराह हा मुलगा अंगद याच्या जन्मानंतर कसा बदलला त्याबद्दल संजनाने मुलाखतीत सांगितले.
मोमेंट ऑफ सायलेन्स पॉडकास्टवर बोलताना संजना गणेशन म्हणाली की, अंगदच्या जन्मानंतर जसप्रीत बुमराह अधिक चांगला क्रिकेटपटू बनला. यामागे नेमके काय कारण आहे याबाबतीतही संजना गणेशनने रोखठोकपणे आपले मत व्यक्त केले.
ती म्हणाली की, घरातील आणि कौटुंबिक जीवनातील स्थैर्यामुळे बुमराहची कामगिरी नवीन उंचीवर पोहोचली आहे. जेव्हा तुमच्याकडे घरी परतण्यासाठी छान कारण असते, वाट पाहणारे लोक असतात, तेव्हा तुमचे आयुष्य सर्वांगाने चांगले बनते.
तिने पुढे सांगितले की, सध्या बुमराह एक वडील आणि एक पती अशा दोन्ही भूमिका बजावतो आहे. अशा वेळी छानसे घर, सुखी संसार असला तर ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्याने तुमच्या कामगिरीतही योग्य तेवढी मेहनत घेता येते.
कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्रेमामुळे त्याचे मानसिक आरोग्य मजबूत झाले आहे. त्याचाच सकारात्मक परिणाम जसप्रीत बुमराहच्या खेळावर स्पष्टपणे दिसून येतो आहे. म्हणूनच एका वर्षात बुमराहने तब्बल ८६ विकेट्स घेतल्या आहेत, असेही संजना म्हणाली.