PAK vs ENG : टीम इंडियाला 'लॉटरी'! इंग्लंडकडून पाकिस्तानने लाज काढून घेतली; आपली वर्ल्ड कप फायनल निश्चित

England vs Pakistan : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत यजमान पाकिस्तानवर विजय मिळवून आश्चर्यकारक निकाल नोंदवला.

England vs Pakistan : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत यजमान पाकिस्तानवर विजय मिळवून आश्चर्यकारक निकाल नोंदवला. कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने ७४ धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा पराभव पाकिस्तानसाठी वाईट बातमी घेऊन आला.

रावळपिंडी कसोटीत इंग्लंड संघाला शेवटच्या सत्रात १० विकेट्स घ्यायच्या होत्या आणि त्यांनी ते करून दाखवले. जॅक लीचने शेवटची विकेट घेतली आणि रावळपिंडीत स्मशान शांतता पसरली. इंग्लंडच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या चाहत्यांना जयघोष दुमदुमला...

इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानने ५७९ धावांचे उत्तर दिले.. रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत सात शतकं झळकल्याने खेळपट्टीवर टीका होऊ लागली. इंग्लंडने दुसरा डाव ७ बाद २६४ धावांवर घोषित करून धाडसी निर्णय घेतला अन् पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले.

पाकिस्तानकडून कडवी टक्कर मिळताना दिसली आणि ते सामना ड्रॉ च्या दिशेने झुकवत होते. पण, ऑली रॉबिन्सनने दोन धक्के दिले. त्यानंतर नसीम शाह व मोहम्मद अली संघर्ष करत होते. पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक असताना १३ मिनिटे बाकी होती आणि स्टेडियमवर सर्वांची धाकधुक वाढली होती.

बेन स्टोक्सने फिरकीपटू जॅक लिचला गोलंदाजीला आणले आणि त्याने डावातील पहिली विकेट घेतली, जी पाकिस्तानची शेवटची विकेट ठरली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६८ धावांत तंबूत परतला अन् इंग्लंडने ७४ धावांनी सामना जिंकला. हा पराभव पाकिस्तानसाठी वाईट बातमी घेऊन आला. पाकिस्तानचा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ( World Test Championship Finals) पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

मालिकेपूर्वी संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. मात्र खराब फलंदाजी आणि पराभवामुळे आता संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडसह संघाला घरच्या मैदानावर एकूण पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ किंवा ऑस्ट्रेलियन संघाने आपापल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला तर पाकिस्तानचा संघ फायनलमधून बाहेर पडू शकतो.

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामने होतील, त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येईल. सध्या, भारत ५२.०८ टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानच्या पराभवानंतर भारताला आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. त्याचवेळी, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर एकच कसोटी जिंकावी लागणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध व्हाईटवॉश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित कसोटीत विजय मिळवला, तर त्यांचाही अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.