३४ षटकांनंतर नवा चेंडू, ५ बॅकअप खेळाडू, क्रिकेटमधील हे नियम आता बदलणार, ICCने दिली मान्यता

ICC, Cricket New Rules: आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) क्रिकेटमधील काही नियमांमध्ये व्यापक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना क्रिकेट नव्या रूपात खेळलं जाताना दिसणार आहे. आयसीसीने संघातील अंतिम ११ खेळाडूंबाबतच्या नियमांमध्ये काही बदल केले असून, हे बदल कसोटी सामन्यांमध्ये जून महिन्यापासून आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जुलै महिन्यापासून लागू होणार आहेत.

आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) क्रिकेटमधील काही नियमांमध्ये व्यापक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना क्रिकेट नव्या रूपात खेळलं जाताना दिसणार आहे. आयसीसीने संघातील अंतिम ११ खेळाडूंबाबतच्या नियमांमध्ये काही बदल केले असून, हे बदल कसोटी सामन्यांमध्ये जून महिन्यापासून आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जुलै महिन्यापासून लागू होणार आहेत.

यातील प्रमुख बदल हे मुख्यत्वेकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार आहेत. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. मात्र आता नव्या नियमानुसार एका डावामधील पहिल्या ३४ षटकांपर्यंत दोन्ही चेंडू वापरले जातील. तर ३५ व्या षटकापासून पुढे डावाच्या अखेरीपर्यंत एकच चेंडू दोन्ही बाजूंनी वापरला जाईल.

३४ षटके संपल्यानंतर ३५ व्या षटकाच्या सुरुवातीला क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढील खेळासाठी दोन पैकी एका चेंडूची निवड करेल. पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामन्यातील षटकांची संख्या घटवून तो सामना २५ षटके किंवा त्यापेक्षा कमी मर्यादेचा खेळवला गेल्यास केवळ एकाच चेंडूचा वापर होईल. तसेच जो चेंडू ३४ व्या षटकानंतर वापरला जाणार नाही, तो राखीव ठेवला जाईल.

आता प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी कन्कशन रिप्लेसमेंटपूर्वी ५ बॅकअप खेळाडूंची नावं सांगावी लागतील. त्यात एक फलंदाज, एक यष्टीरक्षक, १ वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू आणि एका अष्टपैलूचा समावेश असेल. जर बदललेला खेळाडूदेखील जखमी झाला, तर सामनाधिकारी वेगळा पर्याय निवडू शकतात.

सीमारेषेवरील झेल आणि डीआरएसच्या नियमांमध्ये थोडा बदल होणार आहे, पण त्यांचं विवरण नंतर दिलं जाईल.

सुरुवातीला हे प्रस्तावित बदल एका कार्यकारी गटाकडे पाठवले जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने या दुरुस्त्यांना मान्यता दिली आहे.

मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा जुन्या नियमांनुसारच खेळवला जाणार आहे. हा सामना ११ जूनपासून खेळवला जाणार आहे. तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या साखळीपासून नवे नियम लागू होतील.