IPL 2021, RCB: कोहलीच्या एका निर्णयानं संपूर्ण संघाचं नुकसान, यंदाही RCB जेतेपदाला मुकणार?

IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा काल कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) धुव्वा उडवला. आरसीबीच्या या पराभवानंतर आता पुन्हा एकदा एका चर्चेनं जोर धरला आहे.

बंगोलर संघात शेरास सव्वाशेर मातब्बर खेळाडूंचा भरणा असतानाही आजवर एकदाही संघाला जेतेपद पटकावता आलेलं नाही. पण यंदाच्या सीझनमध्ये कोहली ब्रिगेडनं दमदार सुरुवात केली आणि आपलं इरादा स्पष्ट केला होता.

सीझनच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र बंगोलरच्चा संघानं पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरीची नोंद केली आहे. कोलकातासामोर बंगलोर अवघ्या ९२ धावांमध्ये गारद झाला.

बंगलोरच्या या पराभवामागे आता कोहलीच्या एका निर्णयाची चर्चा केली जात आहे. कोहलीनं संघाचा कर्णधार म्हणून हे शेवटचं पर्व असेल अशी घोषणा केली आहे.

कोहलीच्या घोषणेची ही योग्यवेळ होती का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कोहलीनं स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधीच यंदाचं वर्ष संघाचा कर्णधार म्हणून शेवटचं असल्याचं जाहीर केलं आणि सर्वांनाच धक्का बसला.

कोहलीनं स्पर्धा संपल्यानंतर कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याबाबतच्या निर्णयाबाबत विचार करायला हवा होता. स्पर्धा सुरू होणार असतानाच कोहलीच्या घोषणेनं संघाची मानसिकता बदलली अशी टीका आता केली जाऊ लागली आहे.

कोहलीच्या या निर्णयाबाबत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानंही आश्चर्य व्यक्त केलं. कोहलीच्या या धक्कादायक निर्णयानं कदाचित यंदाही आरसीबीला जेतेपदापासून दूर राहावं लागू शकतं, असं महत्त्वाचं विधान गंभीरनं केलं आहे.

कोहलीला जर कर्णधारपदावरुन पायउतार व्हायचच होतं तर त्यानं तसा निर्णय सीझन संपल्यानंतर घ्यायला हवा होता. संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करत असताना अशा पद्धतीनं निर्णय जाहीर करणं संघाच्या एकजुटीवर परिणाम करणारं ठरतं, असं गंभीर म्हणाला. संघ एका प्रकारे भावूक होऊन जातो आणि लक्ष विचलीत होतं, हे काही संघासाठी योग्य नाही, असंही तो म्हणाला.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही कोहलीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. "कोहलीनं घेतलेल्या दोन्ही निर्णयांचा विचार करत आहे. त्यानं स्पर्धा सुरू होण्याआधीच असा निर्णय जाहीर का बरं केलं असावं? यामागचं कारण काय? या विचारात मी पडलोय", असं मांजरेकर म्हणाले.

कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये आजवर फक्त एकदाच अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला आहे. पण जेतेपद काही पटकावता आलेलं नाही. तर आठ वर्षात संघ प्ले ऑफमध्येही पोहोचू शकलेला नाही. फक्त तीन वेळा संघ प्ले ऑफपर्यंत मजल मारू शकला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरीची नोंद करणाऱ्या कोहली, डीव्हिलियर्ससारख्या तगड्या खेळाडूंना आयपीएलचं जेतेपद काही प्राप्त करता आलेलं नाही.