IPL, 2021 RCB vs KKR Virat Kohli : पुढेही RCBसोबतच राहणार का?; पराभवानंतर विराट कोहलीनं केली मोठी भविष्यवाणी

End of Virat Kohli the captain in IPL history - यंदाची आयपीएल स्पर्धा ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ( Royal Challengers Bangalore) कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असल्याचे विराट कोहलीनं ( Virat Kohli) आधीच स्पष्ट केले होते.

End of Virat Kohli the captain in IPL history - यंदाची आयपीएल स्पर्धा ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ( Royal Challengers Bangalore) कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असल्याचे विराट कोहलीनं ( Virat Kohli) आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे IPL 2021चे जेतेपद पटकावून ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा विराट कोहली अँड कंपनीचा प्रयत्न होता. पण, एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders moved to Qualifier 2 ) बाजी मारली आणि क्वालिफायर २ मध्ये जागा पक्की केली. त्यांना दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे.

आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच विराटनं फलंदाजीचा निर्णय घेतला, शारजाच्या लहान ग्राऊंड्सवर तुफान फटकेबाजी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, ० बाद ४९ वरून RCBची गाडी घसरली ती पुन्हा ट्रॅकवर आलीच नाही. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं गोलंदाजांचा योग्य वापर करून घेताना RCBच्या धावांना लगाम लावला.

विराट कोहली ( ३९) आणि देवदत्त पडिक्कल ( २१) हे सलामीवीर वगळले तर RCBचे स्टार आज जमिनीवर आपटले. सुनील नरीननं RCBला मोठे धक्के देताना के भरत, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांची विकेट घेतली. नरीननं २१ धावांत ४ , तर ल्युकी फर्ग्युसननं ३० धावांत २ विकेट्स घेत RCBला ७ बाद १३५ धावांवर रोखले.

शुबमन गिल ( २९) व वेंकटेश अय्यर ( २६) यांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. पण, हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांनी KKRला धक्के देण्यास सुरुवात केले. नितीश राणा ( २३) चुकीचा फटका मारून बाद झाला.

सुनील नरीननं मैदानावर येताच सलग तीन षटकार खेचून KKRवरील दडपण कमी केलं, परंतु मोक्याच्या वेळेला तोही बाद झाला. मोहम्मद सिराजनं १९व्या षटकात दिलेले दोन धक्के RCBला विजय मिळवून देणारे ठरतात, असे वाटू लागले. पण, इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन यांनी संयमी खेळ करताना KKRचा विजय पक्का केला. सिराज, हर्षल व युझवेंद्र यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

''कोलकाताच्या फिरकीपटूंनी डावाच्या मधल्या षटकांत वर्चस्व गाजवले. ते सातत्यानं विकेट्स घेत राहिले. आमची सुरुवात चांगली झाली होती आणि धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. हा सामना कौशल्यपूर्ण गोलंदाजीचा होता, खराब फलंदाजीचा नाही. RCBच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. पण, डावाच्या मधल्या काही षटकांत अधिकच्या धावा चोपल्या गेल्यानं आमच्या विजयाच्या आशा मावळून टाकल्या. तरीही आम्ही अखेरपर्यंत संघर्ष केला. १५ धावा कमी पडल्या,''असे विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला.

तो पुढे म्हणाला की,''सुनील नरीनची आजची कामगिरी अविस्मरणीय होती. आयपीएलमध्ये सातत्यानं विकेट घेणारा गोलंदाज असल्याचं त्यानं आज पुन्हा एकदा सिद्ध केले. केवळ तोच नव्हे, शाकिब, वरुण या तिघांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांनी मिळून आमच्यावर दडपण निर्माण केलं आणि मोठे फटके मारण्यापासून रोखलं.''

युवा खेळाडूंनी पुढे येऊन आक्रमक क्रिकेट खेळावं, असं कल्चर निर्माण करण्यासाठी मी माझ्यापरीनं सर्वतोपरी प्रयत्न केला. टीम इंडियातही मी असाच प्रयत्न करत असतो. मी माझं सर्वोत्तम दिलं, एवढंच म्हणू शकतो. या फ्रँचायझीसाठी मी १२० टक्के दिले आणि यापुढेही खेळाडू म्हणून असेच योगदान देत राहिन. पुढील तीन वर्षांसाठी फ्रँचायझीची नवीन आखणी करण्याची ही योग्य वेळ आहे. मी या फ्रँचायझीसोबतच राहणार आहे. माझ्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे आणि जोपर्यंत आयपीएल खेळतोय, तोपर्यंत या फ्रँचायझीकडून खेळण्यास मी कटीबद्ध आहे,''असेही त्यानं स्पष्ट केलं.

२०११ ते २०२१ या कालावधीत विराटनं RCBचे १४० सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ६६ सामने जिंकले, तर ७० मध्ये पराभव पत्करला. १३९ डावांमध्ये त्यानं ५ शतकं व ३५ अर्धशतकांसह ४१.९९च्या सरासरीनं ४८७१ धावा केल्या. सर्वाधिक १४० सामने फ्रँचायझीचे नेतृत्वकरूनही जेतेपदाची पाटी कोरी राहणारा विराट हा एकमेव कर्णधार आहे.