एकदिवसीय मालिकेत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता टी-२० मालिकेत वर्चस्व राखण्यासाठी सज्ज झाला आहे. आज होणाऱ्या पहिल्या टी-२०मध्येच नाही तर संपूर्ण मालिकेमध्ये भारतीय संघाचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. या सर्वाचं महत्त्वाचं कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-२० सामने ईडन गार्डनमध्ये खेळवले जाणारे आहेत. तसेच हेच कारण नाही तर एकूण पाच कारण आहेत. ज्यामुळे भारतीय संघाचा विजय निश्चित दिसत आहे.
पहिलं कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आतापर्यंत खेळवल्या गेलेल्या १७ टी-२० सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यांत वेस्ट इंडिजला विजय मिळाला आहे. तर १ सामना बरोबरीत राहिला आहे.
दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील भारतीय संघाची कामगिरी. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या ईडन गार्डनवर केवळ एक सामना खेळवला गेला आहे. ज्यामध्ये भारताने विजय मिळवला होता.
भारत आणि वेस्ट इंडिजला क्रमवारीतच्या तागडीमध्ये तोलले असता. यजमान संघाचे पारडे जड दिसत आहे. भारतीय संघ टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिज सातव्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजविरोधात जुलै २०१७ पासून डिसेंबर २०१९ दरम्यान, भारतीय संघाने एकूण १० टी-२० सामने खेळले आहेत. त्यामधील ८ सामन्यात बाजी मारली आहे. म्हणजेच गेल्या १० पैकी आठ सामन्यात भारताने वर्चस्व राखले आहे.
रोहित शर्माची कर्णधार म्हणून आकडेवारीही वेस्ट इंडिजची डोकेदुखी वाढवणारी आहे. रोहित शर्माने २२ सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यातील १८ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. रोहित शर्माच्या विजयाची टक्केवारी ८१.८१ टक्के आहे. किमान २० सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये ही टक्केवारी सर्वोत्तम आहे.