IND vs PAK: "भारताविरूद्ध बाबर आझमची 'ती' सर्वात मोठी चूक"; शोएब अख्तर संतापला

Asia Cup 2023 India vs Pakistan: पाक गोलंदाजांनी भारताला २६६ वर रोखूनही अख्तरने बाबरला सुनावलं

IND vs PAK, Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना अखेर पावसामुळे अनिर्णित राहिला. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करत असताना भारताला चांगलेच धक्के दिले. त्यामुळे भारताला ५० षटकात २६६ पर्यंतच मजल मारता आली.

शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्या वेगवान माऱ्यापुढे पुन्हा एकदा भारताचे दिग्गज फलंदाज नेस्तनाबूत होताना दिसले. विराट, रोहित, गिल, श्रेयस साऱ्यांनीच गुडघे टेकले. इशान किशन आणि हार्दिक पांड्या या दोघांच्या भागीदारीमुळे भारताला २५०चा आकडा गाठता आला.

या दोघांची भागीदारी भारतीयांना दिलासा देणारी ठरली. तरीही भारताकडून सलामीच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. यावरून भारतीय चाहते काहीसे नाराज असतानाच, पाकिस्तानी दिग्गज शोएब अख्तरने मात्र त्यांचा कर्णधार बाबर आझमला चांगलेच झोडपले. बाबरची एक मोठी चूक त्याने सडेतोडपणे मांडली.

अख्तर म्हणाला, "कर्णधार म्हणून बाबरने अधिक आक्रमक व्हायला हवे होते आणि भारत जेव्हा थोडासा ढेपाळला होता तेव्हा त्याने विकेट्स घेण्याची मानसिकता दाखवायला हवी होती."

"जर पाकिस्तान गोलंदाजी अधिक आक्रमक राहिला असता तर भारताचा डाव 170 धावांत आटोपला असता. ते 200 पर्यंत पोहोचलेच नसते आणि त्यामुळे भारताचे स्पर्धेतील मनोधैर्य पूर्णपणे खचले असते."

"जेव्हा भारत संघर्ष करत होता, तेव्हा त्याने फिरकीपटूंना आणले आणि दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोलंदाजी करू दिली. त्यातच भारताला थोडंसं सेट व्हायला वेळ मिळाला आणि त्यांनी २५०+ स्कोअर केला. बाबरने विकेटसाठी प्रयत्न करत राहायला हवं होतं. हीच बाबरची मोठी चूक झाली", असे रोखठोक मत शोएब अख्तरने व्यक्त केले.