T20 विश्वचषक 2022 मध्ये आज भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना ऐतिहासिक ॲडलेड ओव्हलवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे.
या सामन्याबाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की भारताची प्लेइंग इलेव्हन कोणती असेल? या सामन्यात दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या पाठीला दुखापत झाली होती. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये कार्तिकच्या जागी पंतला मैदानावर यावे लागले होते.
भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या म्हणजे सलामीवीर केएल राहुल. केएल राहुलचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. परंतु त्याला सपोर्ट करत राहणार असल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या शीर्ष क्रमात कोणताही बदल करणार नाही. म्हणजेच प्लेइंग-11 मध्ये केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार हे वरच्या फळीतील फलंदाज असतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला संधी देण्यात आली होती. तर दुसरीकडे अक्षर पटेल बांगलादेशविरुद्ध प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता कमी आहे. तसेच बांगलादेशच्या संघात शाकिब, सौम्य सरकार, नजमुल हुसेन शांतो आणि अफिफ हुसेनसारखे डावखुरे फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महागडे सिद्ध होऊनही रविचंद्रन अश्विनला पुन्हा एकदा संधी मिळू शकते, जी डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध धोकादायक ठरू शकते.
बांगलादेशी संघाबद्दल बोलायचे झाले तर, यष्टीरक्षक नुरुल हसन आणि सलामीवीर सौम्य सरकार यांच्या फॉर्म हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशा स्थितीत लिटन दासला भारताविरुद्धच्या सामन्यात यष्टिरक्षण आणि सलामीची जबाबदारी मिळू शकते. दुसरीकडे, सौम्य सरकार मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. तर इबादत हुसेनला अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून आजमावले जाऊ शकते.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा ॲडलेड ओव्हलवर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे आणि त्याने सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 5 शतके झळकावली आहेत. बांगलादेशविरुद्धही कोहली दमदार खेळी करण्याची शक्यता आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत फक्त एकच टी-20 सामना खेळला आहे. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 सामन्यात भारतीय संघाने 37 धावांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे, भारताने ॲडलेड ओव्हलवर सर्व फॉरमॅटसह 29 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 12 सामन्यांत भारतीय संघाला विजय मिळाला होता.
काय असेल भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
काय असेल बांगलादेशची प्लेईंग 11 : जमूल हुसेन शांतो, सौम्य सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, मोसाद्दिक हुसेन, नुरुल हसन, यासिर अली, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद.