मिनी वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीची आजच पहिली सेमी फायनल आहे. थोड्याच वेळात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भिडणार आहेत. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून पहिली फलंदाजी निवडली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे चाहते आपला संघ फायनलमध्ये जावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले असणारच परंतू तिकडे पाकिस्तानचीही धाकधुक वाढली आहे. भारत जिंकला तर एकाच फटक्यात पीसीबीचे १२८ कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत.
आज दोन तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होत आहे. याकडे सर्व क्रिकेटविश्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना होत आहे. या मॅचवर पाकिस्तानचे खूप पैसे लागलेले आहेत. भारत जिंकला तर पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे. परंतू भारत हरला तर पाकिस्तानची बल्ले बल्ले होणार आहे.
खरेतर ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळविली जाणार होती. यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. परंतू, भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने भारताचे सर्व सामने दुबईत खेळविण्यात येत आहेत. यामुळे पाकिस्तान संघालाही भारतासोबत खेळण्यासाठी दुबईला जावे लागले होते.
आताचा खेळ असा आहे, की ९ मार्चला फायनल आहे. ही फायनल कुठे होणार यावर सारे अवलंबून आहे. जर भारत सेमी जिंकला तर फायनल सामना दुबईतच खेळावा लागणार आहे. पण जर ऑस्ट्रेलिया सामना जिंकला तर फायनल पाकिस्तानमध्ये खेळविली जाणार आहे. यामुळे आजच्या सामन्यावर तिकीटांची विक्री सुरु केली जाणार आहे.
या पेचामुळे तिकीट विक्री देखील रखडलेली आहे. भारत फायनलमध्ये गेला तर पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार आहे. यजमान असूनही पाकिस्तानला यजमान पदावरून दूर व्हावे लागणार आहे. यामुळे पाकिस्तान काहीही झाले तरी भारत हरावा अशी प्रार्थना करत असणार आहे.
पाकिस्तानने चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी सर्व स्टेडिअम पुन्हा बांधून काढली आहेत. यात त्यांचा प्रचंड पैसा लागला आहे. फायनल अपेक्षित असलेल्या गद्दाफी स्टेडिअमवर पाकिस्तानने १२८ कोटी रुपये खर्च केले आहेत. जर भारत जिंकला तर गद्दाफी स्टेडिअम रिकामेच राहणार आहे. कारण अंतिम सामना हा दुबईतच खेळविला जाणार आहे.
ज्या ज्या वेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमीमध्ये भिडले आहेत, त्यापैकी बहुतांशवेळी लक ऑस्ट्रेलियाच्या साथीला राहिलेले आहे. दोन्ही संघांत १५१ वन डे खेळविल्या गेल्या आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने ८४ आणि भारताने ५७ विजय मिळविले आहेत.
तर चॅम्पिअन्स ट्रॉफी असेल किंवा आयसीसीची कोणतीही स्पर्धा असेल यातही लक ऑस्ट्रेलियाच्या बाजुने राहिलेले आहे. १८ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने १० तर भारताने ७ सामने जिंकले आहेत.