नवं वर्ष नवा कर्णधार? IND vs AFG ट्वेंटी-२० मालिका; ११ तारखेपासून भारतात रंगणार थरार

IND vs AFG T20 Series: ११ तारखेपासून भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

खरं तर आगामी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त आहेत. तर, रोहित शर्माने मागील ट्वेंटी-२० विश्वचषकापासून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रस दाखवला नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर रोहितला याबद्दल प्रश्न विचारला असता त्याने उत्तर देणे टाळले. आगामी मालिकेतून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती मिळण्याची अपेक्षा आहे.

रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेतील सलामीचा सामना मोहाली येथे खेळवला जाईल.

तर, १४ जानेवारीला इंदूर येथे दुसरा आणि अखेरचा सामना १७ जानेवारीला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा ट्वेंटी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. माहितीनुसार, कोहली आणि रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आगामी मालिकेसाठी निवड समितीची बैठक होत आहे. त्यामुळे आगामी मालिकेत भारतीय संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार हे पाहण्याजोगे असेल.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात येईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

तर, मोहम्मद शमी देखील या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळेल हे स्पष्ट आहे.