इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला. कर्णधार जो रूटनं सलग तिसरं शतक झळकावून टीम इंडियाचा बॅक सिटवर ढकलले. ३५४ धावांची पिछाडी भरून इंग्लंडसमोर लक्ष्य ठेवणे अशक्यच होते, तरीही भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात संघर्ष दाखवला.
रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला. रोहित दुर्दैवीरित्या बाद झाला. पण, पुजारा व कर्णधार विराट कोहली या जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लवढून दिलासादायक कामगिरी केली.
चौथ्या दिवशी नव्या चेंडूने इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. पुजाराला एकही धावेची भर न घातला ९१ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर विराटही ५५ धावांवर बाद झाला अन् २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले.
इंग्लंडनं एक डाव ७६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.ऑली रॉबिन्सननं ६५ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर क्रेग ओव्हरटर्ननं तीन बळी टिपले. जेम्स अँडरसन व मोइन अली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लिड्स कसोटीत पहिल्या डावात टीम इंडियाचे ८ फलंदाज ३० षटकांत ५७ धावांत माघारी परतले होते आणि दुसऱ्या डावात १६.१ षटकांत ६३ धावांत ८ विकेट्स पडल्या.
या विजयाबरोबरच जो रूट हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्यानं ५५ कसोटींत नेतृत्वकरताना सर्वाधिक २७ विजय मिळवले ( Joe Root becomes the most successful Test captain in England history). त्यानं माजी कर्णधार मायकेल वॉन ( ५१ सामने व २६ विजय) यांचा विक्रम मोडला.
या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंग्लंडच्या खात्यातही १४ गुण जमा झाले. टीम इंडियाच्या खात्यातही १४ गुण आहेत. पण, आजच्या निकालानं १२ गुण खात्यात असलेल्या पाकिस्ताननं अव्वल स्थानावर झेप घेतली. वेस्ट इंडिजचा संघही १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर सरकला. टक्केवारीनुसार पाकिस्तान व विंडीज ५०%सह आघाडीवर आहेत. भारत व इंग्लंड यांची टक्केवारी ही ३८.८८ % इतकी आहे, कारण त्यांनी तीन कसोटी सामने खेळले.